Vidhan Parishad Election: ठाणे एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेची उमेदवारी
Vidhan Parishad Election: ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. शिंदे गटाकडून ठाण्यातून माजी आमदार रवींद्र फाटक यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. विशेषतः हितेंद्र ठाकूर यांचे नावही चर्चेत होते. मात्र, अखेर पक्षाने रवींद्र फाटक यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.
ठाण्यातील टेंभी नाका येथील ‘आनंद आश्रम’ या पक्ष कार्यालयात वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फाटक यांना उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आला. या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र फाटक दुपारी १२ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता उमेदवारांच्या घोषणांना वेग आला असून ठाणे विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे मतदारसंघावर आपला दावा कायम राखत फाटक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ठाण्यातील निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला मिळालेल्या चार जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे समोर येत आहेत.
ठाणे-पालघर मतदारसंघातून रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण रवींद्र फाटक यांना उमेदवारीचा अर्ज दिल्यानंतर आता त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. दुसरीकडे परभणी-हिंगोली मतदारसंघातून अभिमन्यू खोतकर आणि बिप्लव बजोरिया यांची नावे चर्चेत आहेत.
नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून किरण पांडव यांच्याही नावांची चर्चा आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय आज वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला अखेरीस चार जागा येणार की पाच, तसेच कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अंतिम जागावाटप आणि उमेदवारांच्या घोषणेनंतर विधान परिषद निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.






