(photo -Social Media)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात Gen Z सोबत संवाद साधणार असताना या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात झालेल्या Gen Z च्या कार्यक्रमाला ‘पेड इव्हेंट’ म्हटल्याचा संदर्भ देत राऊतांनी नागपुरातील कार्यक्रमावर थेट सवाल उपस्थित केला.
Gen Z च्या प्रश्नांकडे आता सरकारचे लक्ष गेले आहे, यामागे तरुण कार्यकर्त्यांच्या आंदोलनांचा आणि त्यांच्या मांडणीचा प्रभाव असल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी काही तरुण कार्यकर्त्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमावर उपरोधिक टिप्पणी केली.
संजय राऊत यांनी यावेळी थेट सवाल करत भाजपवर निशाणा साधला. ‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’ असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना ‘पेड इव्हेंट’ म्हणून हिणवणे योग्य नसल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी राऊतांनी लाडकी बहीण योजना आणि बिहारमधील आर्थिक मदतीचा संदर्भ देत भाजपच्या राजकारणावर टीका केली. भाजप स्वतःच ‘पेड इव्हेंट’ असल्याची बोचरी टिप्पणी त्यांनी केली.
बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
दरम्यान, राऊतांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दाही उपस्थित केला. आंबेगावमधील एका शाळेत देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला. कच्चे धान्य आणि वाटाणा शिजत नसल्याचा आरोप करत संबंधित पुरवठादारांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राऊतांनी केला.
शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला असताना तिच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत राऊतांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच संबंधित अन्नधान्य पुरवठादारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
एकीकडे Gen Z च्या प्रश्नांवर संवाद साधण्याचा सरकारचा प्रयत्न आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवरील आरोप यामुळे शिक्षण आणि तरुणांच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






