सोनभद्रचे सालखान उद्यान! जिथे दगड बोलतात पृथ्वीच्या जन्माची कहाणी; युनेस्को जागतिक वारसा स्थळासाठी मोठी तयारी सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Salkhan Fossil Park Sonbhadra News : पृथ्वीच्या उदरात अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्यांचा शोध घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आजही धडपडत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या भारतातील उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यामध्ये एक असे ठिकाण आहे, जिथे पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीची पहिली पानं दगडांच्या रूपात आजही जिवंत आहेत. कैमूरच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ‘सालखान जीवाश्म उद्यान’ (Salkhan Fossil Park) हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून, पृथ्वीचा १६० कोटी वर्षांचा इतिहास सांगणारा एक अमूल्य ठेवा आहे. हे उद्यान अमेरिकेच्या ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’पेक्षाही जुने असल्याचा दावा केला जात असून, आता याला युनेस्को जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site) म्हणून घोषित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
सोनभद्रच्या रॉबर्ट्सगंजपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर २४ ते २५ हेक्टर क्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. १९३३ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (GSI) याचा शोध लावला होता. २००२ मध्ये ४० हून अधिक देशांतील शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन संशोधन केले आणि या स्थळाची जागतिक ताकद मान्य केली. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे १.६ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर ऑक्सिजनचा विकास झाला नव्हता, तेव्हा येथे समुद्राच्या लाटा होत्या. तिथे ‘सायनोबॅक्टेरिया’ (शेवाळ) च्या रूपात जीवनाची पहिली ठिणगी पडली. हेच शेवाळ पुढे दगडांच्या रूपात जतन झाले, ज्याला आपण आज जीवाश्म म्हणतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CIA vs ODNI: अमेरिकेत अंतर्गत कलह! सीआयएने इराणची गुप्त माहिती रोखली; सर्वोच्च गुप्तचर संस्थांमध्ये ‘या’ मोठ्या कारणामुळेच जुंपली
स्थानिक लोक सालखानमधील या रचनांना ‘दगडी फुले’ किंवा ‘दगडी झाडे’ म्हणतात. विज्ञानाच्या भाषेत यांना ‘स्ट्रोमॅटोलाइट्स’ (Stromatolites) असे म्हटले जाते. हे सायनोबॅक्टेरियाच्या थरांनी बनलेले प्राचीन अवशेष आहेत. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या पहिल्या सजीवांचे हे अवशेष आजही जसेच्या तसे पाहायला मिळतात, ही निसर्गाची मोठी किमया आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जीवाश्म इतके स्पष्ट आहेत की, उघड्या डोळ्यांनीही तुम्ही पृथ्वीच्या उत्क्रांतीचा प्रवास पाहू शकता.
जिल्हा दंडाधिकारी बी. एन. सिंग यांच्या नेतृत्वाखाली या स्थळाचा कायापालट करण्याची तयारी सुरू आहे. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश झाल्यानंतर, आता येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सुमारे २ कोटी रुपये खर्च करून येथे आधुनिक संग्रहालय (Museum), उपहारगृह, स्वच्छ शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. तसेच, येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वतंत्र एन्ट्री पॉईंटची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर सोनभद्रच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी कलाटणी मिळेल.
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या स्थळावर पर्यटकांनी काही तक्रारीही केल्या होत्या. पिण्याचे पाणी आणि निवासाची कमतरता यांसारख्या समस्या मांडल्या गेल्या होत्या. मात्र, आता प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन कामाला गती दिली आहे. येथील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी परिसरात बांधकामावर बंदी घालण्यात आली असून, सौर ऊर्जा आणि वृक्षारोपणाद्वारे उद्यानाचे सौंदर्य वाढवण्याचे नियोजन आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drug Seizure : बॉर्डरच्या खाली ‘ड्रग्ज एक्सप्रेस’! कॅलिफोर्नियामध्ये सापडला 99 वा गुप्त बोगदा; 4 आंतरराष्ट्रीय तस्कर गजाआड
आज जग आपला भूतकाळ शोधत असताना, सालखान जीवाश्म उद्यान हे भारताचे नाव जागतिक नकाशावर कोरण्यासाठी सज्ज आहे. जर याला युनेस्कोची अंतिम मोहोर मिळाली, तर हे ठिकाण जगातील सर्वात मोठे भूवैज्ञानिक पर्यटन केंद्र बनेल. पृथ्वीची ही १६० कोटी वर्षांची जुनी कहाणी पाहण्यासाठी आता जगभरातून पर्यटक सोनभद्रकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






