कल्पनेचे पंख, अवकाशाचा स्पर्श! वाचा कल्पना चावलाची आकाशगंगा प्रवासकथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kalpana Chawla Birthday : आज १७ मार्च, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची ६३ वी जयंती. अंतराळात जाऊन इतिहास रचणाऱ्या आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कल्पना चावलाने आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण केले आणि अवकाशात भारताचे नाव उज्ज्वल केले. हरियाणातील कर्नाल येथे १७ मार्च १९६२ रोजी जन्मलेल्या कल्पनाचे बालपण अत्यंत अभ्यासू आणि जिद्दी स्वभावाचे होते. त्यांचे वडील बनारसी लाल चावला आणि आई संज्योती चावला यांनी तिच्या शिक्षणात कधीही अडथळा आणला नाही, मात्र त्यांना कल्पनाने शिक्षिका व्हावे असे वाटत होते. पण कल्पनाला आकाशाच्या गूढतेकडे ओढ लागली होती, आणि तिने अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले.
कल्पना चावलाने पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली. यानंतर, उच्च शिक्षणासाठी तिने अमेरिकेचा मार्ग धरला. १९८४ मध्ये कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिच्या शिक्षणातील प्राविण्य आणि कष्ट पाहून तिला १९८८ मध्ये पीएचडीची पदवी मिळाली. शिक्षणाच्या या प्रवासादरम्यान तिने अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.
१९८८ मध्ये कल्पना चावलाने NASA मध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तिचे योगदान लक्षणीय ठरले. १९९४ मध्ये तिची अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली आणि ती अंतराळवीर म्हणून नियुक्त करण्यात आली. हा क्षण तिच्या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दहशतवादाविरोधात अमेरिका आणि रशिया एकत्र; दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक
१९९७ मध्ये कल्पना चावलाने पहिल्यांदा अंतराळ प्रवास केला. ती कोलंबिया अंतराळ यानावरून अंतराळात झेपावली. १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान झालेल्या या मोहिमेमध्ये तिने महत्त्वाचे प्रयोग आणि संशोधन केले. भारतातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा मान तिने पटकावला आणि या यशाने संपूर्ण भारत तिच्या कर्तृत्वाचा गौरव करू लागला.
पहिल्या मोहिमेनंतर २००३ मध्ये कल्पना चावलाने दुसऱ्यांदा अंतराळ प्रवास केला. यावेळीही ती कोलंबिया शटलवरून अंतराळात गेली. १६ दिवसांची ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरत असताना, १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीवर परत येताना कोलंबिया शटलचे तांत्रिक बिघाडामुळे वातावरणात प्रवेश करताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कल्पना चावलासह इतर सहा अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण जगाला हादरवून गेली.
कल्पना चावलाच्या या त्याग आणि कर्तृत्वामुळे ती केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली. तिच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कार आणि सन्मान देण्यात आले. भारत सरकारने तिच्या नावाने शिष्यवृत्ती आणि पुरस्कार सुरू केले. अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती आजही एक प्रेरणास्रोत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेत भीषण वादळाचा तडाखा; 26 जणांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर
कल्पना चावला हिची जिद्द, मेहनत आणि अवकाशाच्या दिशेने घेतलेली झेप आजही लाखो तरुणांना प्रेरणा देते. ती जरी आज आपल्यात नसली तरी तिच्या कार्याने ती अमर झाली आहे. तिचे स्वप्न आणि त्याची पूर्तता करणारी जिद्द आजच्या पिढीने आत्मसात करावी, हीच तिच्या जयंतीनिमित्त आदरांजली!