व्हीआरडीई यांनी विकसित केलेल्या ‘विक्रम व्हीटी-२१’ या अत्याधुनिक चिलखती लढाऊ वाहनाचे अनावरण करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
अहिल्यानगर : सुनयना सोनवणे : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) अंतर्गत वाहन संशोधन व विकास प्रतिष्ठान (व्हीआरडीई) यांनी विकसित केलेल्या ‘विक्रम व्हीटी-२१’ या अत्याधुनिक चिलखती लढाऊ वाहनाचे शनिवारी (ता. २५) अहिल्यानगर येथे ध्वजारोहण आणि अनावरण करण्यात आले. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि भारत फोर्ज यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे ॲडडव्हान्स्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या वाहनाचे अनावरण डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसीईचे महासंचालक डॉ. प्रतीक किशोर, पीसी अँड एसआयच्या महासंचालक डॉ. चंद्रिका कौशिक, भारत फोर्जचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्सचे सुकरण सिंग तसेच व्हीआरडीईचे संचालक जी. राममोहन राव उपस्थित होते.
हे देखील वाचा : पश्चिम घाटातील ड्रॅगनफ्लाय प्रजातींमध्ये ३५ टक्के घट; जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा
डॉ. कामत यांनी या वेळी सरकारच्या संरक्षण निर्मिती धोरणाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘ज्या प्रणाली देशातील उद्योग क्षेत्र स्वतः विकसित करू शकतात, त्यात ‘डीआरडीओ’ने वेळ घालवू नये. त्याऐवजी, ‘डीआरडीओ’ने खाजगी उद्योगांसोबत भागीदारी करून केवळ अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जास्त जोखीम असलेल्या प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे.’ ‘विक्रम व्हीटी २१’ हे वाहन सध्या ६० टक्के स्वदेशी बनावटीचे असून, प्रत्यक्ष उत्पादनाच्या वेळी हे प्रमाण अधिक वाढेल. केवळ तीन वर्षांच्या विक्रमी वेळेत या वाहनाचे डिझाइन ते प्राथमिक नमुना (प्रोटोटाइप) असा प्रवास पूर्ण करणे, हे संरक्षण क्षेत्रातील भागीदारीचे मोठे यश आहे. परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी आता केवळ मुख्य प्रणालीच नव्हे, तर उपप्रणाली आणि तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. कौशिक म्हणाल्या, ‘भारतीय सैन्याचे यांत्रिक पायदळ १९८६ पासून ‘बीएमपी-२’ प्रकारातील वाहने वापरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार ही वाहने बदलण्यासाठी २००५ मध्ये ‘भविष्यातील लढाऊ वाहन’ ही संकल्पना पुढे आली. मात्र, गेल्या दीड दशकात अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पुढे सरकू शकला नाही. अखेर २०२२ मध्ये ‘डीआरडीओ’ने काळाची गरज ओळखून या ट्रॅक आणि चाकी प्लॅटफॉर्मची जबाबदारी स्वीकारली. प्रगत सुरक्षा प्रणालीने सज्ज असलेली अशी ४८० वाहने लष्कराला अपेक्षित आहेत. अवघ्या तीन वर्षांत आम्ही याचा नमुना तयार केला असून, आता २०२८ पर्यंत ही प्रणाली प्रत्यक्ष सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे.’
हे देखील वाचा : संरक्षण प्रकल्पांसाठी ‘अवास्तव निविदा’ टाळा; DRDO अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या सूचना
‘कोणतीही जटिल संरक्षण प्रणाली तयार करणे हे सोपे काम नसते. मात्र, एप्रिल २०२५ मध्ये या वाहनाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आणि डिसेंबर अखेरपर्यंत पहिला प्लॅटफॉर्म उभा राहिला. हे वाहन भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज असून, यामध्ये आवश्यकतेनुसार विस्तारक्षम आहे. या प्रकल्पात टाटा आणि भारत फोर्ज यांच्यासह टियर-२ व टियर-३ उद्योगांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. ‘मेक इन इंडिया’चा हा उत्तम वस्तुपाठ आहे,’ असे डॉ. किशोर यांनी सांगितले.






