World Water Day : 'पाणी हेच जीवन!' वाचा कसे करू शकतो मानव 'या' जलसंकटाचा सामना? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर जागरूकता निर्माण केली जाते. पाणी हे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान नैसर्गिक साधन असून, त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि वापराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पृथ्वीच्या ७१ टक्के भागावर पाणी आहे, मात्र त्यातील केवळ ३ टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. सध्या, अनेक देश आणि भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जलप्रदूषण आणि पाण्याचा अतिवापर यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी हा सर्वांत महत्त्वाचा आणि दुर्मिळ संसाधन ठरू शकतो.
१९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे पर्यावरण आणि विकास परिषद आयोजित केली. त्याचवेळी जागतिक जल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्च १९९३ रोजी प्रथमच हा दिवस जगभरात पाळला गेला आणि तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. २०१० मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाने सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता याला मानवी हक्क म्हणून घोषित केले. यामुळे प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ॲमेझॉनच्या जंगलात सापडला पृथ्वीवरील सर्वात लांब ॲनाकोंडा; शास्त्रज्ञांच्या ‘या’ शोधाने जग हादरले
प्रत्येक वर्षी जागतिक जल दिनासाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते, जी त्या वर्षातील पाणीविषयक सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते. २०२५ साठीची अधिकृत थीम “हिमनदी संवर्धन” आहे. हिमनद्या म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या पाण्याच्या साठ्यांपैकी एक. या हिमनद्या गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत आणि त्या नद्यांना, तलावांना आणि संपूर्ण परिसंस्थेला आवश्यक पाणी पुरवतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत, त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे, म्हणूनच ‘पाणी हेच जीवन’ असे म्हटले जाते. आजच्या घडीला अनेक ठिकाणी जलसंकट निर्माण झाले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पाण्याचा अपव्यय यामुळे शुद्ध पाण्याच्या स्त्रोतांवर प्रचंड ताण येत आहे. तज्ञांच्या मते, बहुतेक लोक पाण्याचा गैरवापर करताना त्याचे परिणाम लक्षात घेत नाहीत. अंघोळ, कपडे धुणे, वाहने धुणे आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. मात्र, यातील बऱ्याच बाबतीत पाण्याचा अनावश्यक अपव्यय केला जातो, जो रोखणे अत्यावश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दिवस साजरा करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
पाण्याचा अपव्यय रोखणे
सर्वसामान्यांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे
‘पाणी वाचवा’ अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे
जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणे
१. पाणी जपून वापरा: गरजेपुरतेच पाणी वापरण्याची सवय लावा.
2. पुनर्वापराचा विचार करा: पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, यावर भर द्या.
3. जलसंवर्धन प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा: पावसाचे पाणी साठवण्याच्या योजना राबवा.
4. प्रदूषण टाळा: जलप्रदूषण रोखण्यासाठी जबाबदारीने वर्तन करा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या क्रमांकावर?
जागतिक जल दिन केवळ एक साधा वार्षिक उपक्रम नसून, तो एक गंभीर विषय आहे. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी आजच पाण्याच्या संवर्धनावर भर देणे आवश्यक आहे. हिमनदी संवर्धनासारख्या उपक्रमांमध्ये योगदान देऊन आपण पृथ्वीच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकतो. त्यामुळे पाणी वाचवणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घ्यायला हवा.
“आज पाणी वाचवा, उद्या जीवन वाचेल!”