हार्दिकने स्वीकारली पराभवाची जबाबदारी (फोटो सौजन्य - Instagram)
पराभवानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक निःशब्द
सामन्यानंतर प्रसारकाशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “खरं सांगायचं तर, सध्या माझ्याकडे जास्त काही बोलण्यासारखं नाही. मला वाटतं की, आम्हाला खरोखरच मागे जाऊन आमच्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि आमच्याकडून कुठे चूक होत आहे हे पाहण्याची गरज आहे. ही चूक एका खेळाडूमुळे आहे का? संपूर्ण संघामुळे आहे का? की आमच्या नियोजनाच्या अभावामुळे आहे? आम्ही पुढच्या सामन्यापूर्वी हे शोधून काढू आणि पुढे काय करता येईल ते पाहू.”
सध्या मुंबई इंडियन्सची अवस्था खूपच खराब आहे. कारण सलग चार सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि बऱ्याच अंशी याचं खापर हार्दिक पंड्यावरही फुटत आहे. योग्य कप्तानी न केल्यामुळे हार्दिकला ट्रोल केले जात आहे.
पंजाबने सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी केली – हार्दिक
पांड्या पुढे म्हणाला, “मला वाटते की या विजयाचे श्रेय पंजाबला द्यायलाच हवे. चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला होता. दुसऱ्या डावात दव पडले होते, ज्यामुळे फलंदाजी करणे थोडे सोपे झाले, पण असे असूनही, त्यांनी आमच्यावर पूर्णपणे मात केली. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आणि निश्चितच क्षेत्ररक्षणही उत्तम केले. त्यामुळेच त्यांना विजय मिळाला. मला वाटते की आपल्याला काही कठीण निर्णय घेण्याची गरज आहे की आपण फक्त खेळत राहायचे आहे, हे पाहण्याची गरज आहे. आशा आहे की, येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही सुधारणा करू.”
डी कॉकचे शतक व्यर्थ ठरले
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, क्विंटन डी कॉकच्या शतकामुळे मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या. डी कॉकने ६० चेंडूंमध्ये ११२ धावांची नाबाद खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. पंजाबने १६.३ षटकांत ३ गडी गमावून १९८ धावा करत सहजपणे लक्ष्य गाठले. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने नाबाद ८० धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने ६६ धावांचे योगदान दिले.
वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले






