ढाकामध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भारताने बांगलादेश सरकारला फटकारले, हिंदू सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Durga temple vandalised Dhaka : बांगलादेशातील हिंदू समाजावर पुन्हा एकदा धार्मिक असहिष्णुतेचा हल्ला झाला असून, राजधानी ढाका येथील खिलखेत परिसरात दुर्गा माता मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर सुरक्षा पुरवण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला स्पष्ट शब्दांत सुनावले असून, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन केले आहे.
ढाकामधील खिलखेत परिसरात असलेल्या दुर्गा मंदिरावर अतिरेकी गटांकडून दीर्घकाळ धमक्या येत होत्या, असेही समोर आले आहे. यासंदर्भात भारताने माहिती दिली की, अतिरेकी घटक या मंदिराच्या विध्वंसाची मागणी करत होते. मात्र, सुरक्षा पुरवण्याऐवजी, बांगलादेश सरकारने या मंदिराच्या बांधणीस ‘बेकायदेशीर’ घोषित करून त्याच्या पाडण्यास परवानगी दिली. परिणामी, मूर्ती सुरक्षितपणे काढण्याआधीच मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Labour Day 2025: श्रमिकांच्या हक्कांचा जागर आणि संघर्षाच्या इतिहासाची आठवण
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “बांगलादेशातील हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही तिथल्या सरकारची जबाबदारी आहे. अशा घटना वारंवार घडत असलेल्या पाहून आम्हाला गंभीर चिंता वाटते.” जयस्वाल यांनी ही घटना फक्त धार्मिक असहिष्णुतेपुरती मर्यादित नसून, भारत-बांगलादेश संबंधांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “भारत सर्व मुद्यांवर संवादासाठी तयार आहे, पण त्यासाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे.”
Muhammad Yunus-led terr*orist government is demolishing Durga Temple in #Dhaka.
Hindu minorities of Bangladesh are helpless.
And why the World is silent! pic.twitter.com/TSrCSV589F
— Hindu Voice (@HinduVoice_in) June 26, 2025
credit : social media
या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा द्विपक्षीय चर्चेच्या गरजेवर भर दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार, जलवाटप आणि सीमारेषेवरील अस्थिरतेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा सुरु आहे. गंगा पाणी कराराचे नूतनीकरण, तसेच सीमावर्ती भागातील सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे. जयस्वाल म्हणाले, “भारताने वाणिज्य सचिव पातळीवर बांगलादेशी अधिकाऱ्यांशी याआधीही या बाबी मांडल्या आहेत. मात्र, हिंदू समाजाच्या सुरक्षेबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, ही खेदाची बाब आहे.”
या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने बांगलादेशातून होणाऱ्या तयार कपडे आणि अन्य वस्तूंच्या आयातीवर काही निर्बंध लावले होते. भारत सरकारचा हेतू होता, द्विपक्षीय व्यापारात समानता आणि निष्पक्षता राखणे. त्यामुळे या धार्मिक घटनेला व्यापार आणि राजनैतिक पातळीवरील घडामोडींशी जोडूनही पाहिले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
ढाक्यातील दुर्गा मंदिराच्या विध्वंसाने भारतातील संताप वाढवला आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताने स्पष्ट शब्दांत बांगलादेश सरकारकडे तक्रार नोंदवून, हिंदू समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी बजावण्याची मागणी केली आहे. यानंतर बांगलादेश सरकारकडून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.