निसर्गाची 'Time Capsule'! आंध्र प्रदेशातील 'झिरकॉन' खनिजाने उलगडले पृथ्वीच्या जन्माचे सर्वात मोठे रहस्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India Antarctica Separation History : आपण ज्या पृथ्वीवर (Earth) राहतो, तिचा भूगोल नेहमीच असा नव्हता जसा तो आज नकाशावर दिसतो. आज जिथे अथांग महासागर पसरलेले आहेत, तिथे कधीकाळी विशाल भूभाग एकमेकांना घट्ट कवटाळून बसले होते. विज्ञानाच्या जगतातून आता एक अत्यंत थक्क करणारी आणि प्रत्येक भारतीयाला कुतूहल वाटेल अशी माहिती समोर आली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या भूवैज्ञानिकांनी केलेल्या एका संयुक्त संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कोट्यवधी वर्षांपूर्वी भारत हा आजच्या बर्फाळ अंटार्क्टिका खंडाचाच एक अविभाज्य भाग होता. पूर्व भारत आणि अंटार्क्टिका हे दोन्ही भूप्रदेश एकाच प्राचीन पर्वतरांगेच्या साखळीने जोडलेले होते, ज्याचे जिवंत पुरावे आजही आंध्र प्रदेशातील पर्वतांमध्ये दडलेले आहेत.
कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या नैसर्गिक आणि गणितीय विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक शंकर बोस यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने या अभ्यासात आधुनिक खनिजशास्त्र तंत्राचा वापर केला. शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातील विजयनगरम आणि सालूर या प्रदेशातील प्राचीन खडकांचे नमुने गोळा केले. या खडकांचा रासायनिक आणि भूवैज्ञानिक अभ्यास केला असता, शास्त्रज्ञांचे डोळे विस्फारले. या खडकांचे वय, त्यांची अंतर्गत रचना आणि त्यामधील खनिजांचे गुणधर्म हे हजारो किलोमीटर दूर असलेल्या पूर्व अंटार्क्टिका खंडातील खडकांशी तंतोतंत जुळत आहेत. हे दोन्ही प्रदेश एकेकाळी ‘रेनर ईस्टर्न घाट ओरोजेन’ (Rayner Eastern Ghats Orogen) नावाच्या एकाच भव्य भूवैज्ञानिक प्रणालीचा आणि पर्वतरांगेचा भाग होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melodi : रोममध्ये रंगली स्वीट ‘मेलोडी’ डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना दिली अत्यंत खास भेट; VIDEO VIRAL
हा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘ग्रॅन्युलाइट्स’ (Granulites) या रूपांतरित खडकांचा अभ्यास केला. हे खडक पृथ्वीच्या शेकडो किलोमीटर खाली प्रचंड उष्णता आणि दाबाच्या प्रक्रियेतून तयार होतात. या खडकांमध्ये ‘झिरकॉन’, ‘गार्नेट’ आणि ‘मोनाझाइट’ सारखी मौल्यवान खनिजे साठलेली असतात. भूवैज्ञानिकांच्या मते, ‘झिरकॉन’ (Zircon) हे निसर्गातील सर्वात कणखर आणि मजबूत खनिज मानले जाते. पृथ्वीवर कितीही मोठे प्रलय आले, भूकंप झाले किंवा ज्वालामुखी फाटले, तरी झिरकॉन नष्ट होत नाही. ते अत्यंत उष्णता आणि दाब सहन करून आपल्या आत इतिहासाचे धागेदोरे जपून ठेवते. शास्त्रज्ञांनी या झिरकॉनच्या स्फटिकांमधील युरेनियम आणि शिसे यांसारख्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयाचा (Radioactive Decay) अभ्यास केला, ज्यामुळे त्यांना अब्जावधी वर्षांपूर्वीच्या घटनांची अचूक तारीख आणि वेळ समजण्यास मदत झाली.
विजयनगरम आणि पूर्व अंटार्क्टिका या दोन्ही ठिकाणच्या खडकांमध्ये पृथ्वीच्या इतिहासातील तीन प्रमुख वादळी टप्प्यांचे समान पुरावे नोंदवले गेले आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष
आज भारत आणि अंटार्क्टिका यांच्यात हजारो किलोमीटरचा अथांग हिंदी महासागर पसरलेला आहे. मग हे दोन भूभाग एकमेकांपासून वेगळे कसे झाले? याचे उत्तर ‘गोंडवाना’ (Gondwana) महाखंडाच्या इतिहासात दडलेले आहे. सुमारे १३ ते १५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे गोंडवाना या महाखंडाचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली. या विघटनामुळे भारताची ‘टेक्टोनिक प्लेट’ अंटार्क्टिकापासून तुटली आणि ती वेगाने उत्तरेकडे आशिया खंडाच्या दिशेने सरकू लागली. तर दुसरीकडे अंटार्क्टिकाचा भूभाग दक्षिण ध्रुवाकडे सरकला. या महाभयंकर प्रवासामुळे दोन्ही खंडांना जोडणारी ती प्राचीन पर्वतरांग मध्येच तुटली. आज भौगोलिकदृष्ट्या हे देश प्रचंड दूर गेले असले, तरी आंध्र प्रदेशातील खडक आजही ओरडून सांगत आहेत की, भारताचे मूळ अंटार्क्टिकाच्या कुशीत दडलेले होते.






