बांगलादेशात पुन्हा बंड होणार? मोहम्मद युनूसची एक चूक आणि सरकार होणार नेस्तनाबूत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्याची संधी मिळेल, असे युनूस यांनी जाहीर केल्याने विरोधक संतप्त झाले असून संपूर्ण देशभर आंदोलनांचे वादळ उठले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि विविध विद्यार्थी संघटनांनी हा जनतेचा अपमान असल्याचे सांगत अवामी लीगवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, युनूस यांच्या वक्तव्यामुळे अंतरिम सरकारमध्येही तणाव निर्माण झाला आहे. सरकारमधील काही वरिष्ठ नेत्यांनी अवामी लीगवरील बंदी कायम ठेवावी, असे सांगितले होते. मात्र, युनूस यांच्या भूमिकेमुळे नाहिद इस्लाम आणि अन्य नेते संतप्त झाले आहेत. अवामी लीग हा मानवतेविरुद्ध गुन्हे करणारा पक्ष असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आला आहे. या पक्षातील काही नेते गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच, सरकारच्या काही नेत्यांनी अवामी लीगला निवडणुकीत भाग घेण्यास संधी देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China News: अंतराळातही ड्रॅगनचे वर्चस्व! अवघ्या पाच दिवसांत दोन रॉकेट प्रक्षेपण, सहा उपग्रह कक्षेत
युनूस यांच्या वक्तव्यानंतर बीएनपीने देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास, देशाच्या जनतेवर अन्याय होईल, असे बीएनपीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, विविध विद्यार्थी संघटनांनी सरकारविरोधात जोरदार मोर्चे काढले आहेत. या निर्णयामुळे बांगलादेशातील लोकशाही धोक्यात येईल आणि जनतेचा विश्वासघात होईल, असा आरोप विद्यार्थी नेत्यांनी केला आहे. त्यामुळे बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रोफेसर युनूस यांनी आंतरराष्ट्रीय संकट गट (ICG) च्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले की, बांगलादेशात दोन वेगवेगळ्या निवडणूक वेळापत्रकांवर विचार सुरू आहे.
मात्र, युनूस यांच्या या वक्तव्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण केला आहे. हा निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, की फक्त विरोधकांना शांत करण्याची खेळी आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे की, अवामी लीगमधील नेत्यांवर कायदेशीर कारवाई होईल. हेगस्थित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात (ICC) या नेत्यांना पाठवण्याचा विचार सरकार करत आहे. संयुक्त राष्ट्रांनी जुलै महिन्यातील उठावादरम्यान झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर, अवामी लीगच्या नेत्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, बांगलादेशात मोठ्या राजकीय अस्थिरतेची चिन्हे दिसत आहेत.
बांगलादेशात याआधीही राजकीय बंडखोरी आणि हिंसाचाराचे सत्र सुरू राहिले आहे. यामुळे, पुढील काळातही देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलने आणि संभाव्य बंडखोरी होऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनविरुद्धच्या युद्धासाठी अमेरिकेचा मेगा प्लॅन; गुप्त दस्तऐवजांनी उलगडले रहस्य
युनूस यांच्या वक्तव्याने बांगलादेशाच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. अंतरिम सरकारमध्येही मतभेद वाढले आहेत, आणि रस्त्यावर विरोधी पक्षांचे आंदोलन तीव्र झाले आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्याची संधी देण्याचा निर्णय बांगलादेशातील राजकीय अस्थिरता वाढवू शकतो. परिणामी, आगामी काळात बांगलादेशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता नाकारता येत नाही.