(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
देशभरातील कांद्यांच्या भावावाढीला आळा घालण्यासाठी आता सरकार प्रयत्न करत आहे. देशभरातील कांद्याच्या भाववाढीला आळा घालण्यासाठी, सरकारने आपला राखीव साठा विशेष रेल्वे डब्यांद्वारे अशा शहरांना पाठवण्यास सुरुवात केली आहे जिथे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहेत. या मोहिमेला सरकारने कांदाएक्सप्रेस असं नाव दिलं आहे.
ग्राहक व्यवहारासंबंधित सचिव निधी खरे यांनी स्पष्ट केलं की, कांदा सुरुवातीला जास्त खप असलेल्या पाच प्रमुख शहरांमध्ये पाठवला जात आहे, जिथे तो ₹३५ प्रति किलो या सवलतीच्या दराने विकला जाईल. सध्या ‘कांदा एक्सप्रेस’मध्ये भरण्यात येत असलेला हा माल बुधवार, २६ ऑगस्टपर्यंत निश्चित केलेल्या बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली / NCR
चेन्नई
मदुराई
एर्नाकुलम / कोची
गुवाहाटी
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार, या शहरांमध्ये कांद्याचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत रेल्वेगाड्या या शहरांमध्ये पोहोचतील, त्यानंतर बाजारपेठेच्या गरजेनुसार कोलकाता आणि लखनौसारख्या इतर शहरांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. यातून सरकारच्या कांदा एक्सप्रेसला सुरुवात होणार आहे.
बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कांद्याचा वापर केला जात आहे. यासाठी हा कांदा बफर स्टॉकमधून काढून प्रामुख्याने या दोन सहकारी संस्थांच्या मोबाईल व्हॅन आणि आउटलेटद्वारे किरकोळ स्तरावर ग्राहकांना विकला जाणार आहे.
NCCF (नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया)
NAFED (नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया)
देशभरात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीनंतर केंद्र सरकार ही परिस्थिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवार, २४ ऑगस्ट रोजी, देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ भाव गेल्या वर्षीच्या २७.३७ रुपयांच्या तुलनेत ४३.५३ रुपये प्रति किलोवर पोहोचला. ही वर्षभरात ५९% पेक्षा जास्त दरवाढ दर्शवते. सरासरी घाऊक भावातही वार्षिक ६८% वाढ होऊन तो ३५.५८ रुपये प्रति किलो इतका पोहोचला आहे.
दिल्ली आणि चेन्नईसारख्या काही प्रमुख शहरांतील किरकोळ बाजारांमध्ये कांदा ५५ ते 65 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कोलकातामध्येही भाव ₹५३ प्रति किलो आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील सणासुदीची मागणी आणि हवामानामुळे होणारी भाववाढ रोखण्यासाठी, सरकारने १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा ठेवला आहे, जो टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.






