(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात ७ रुपयांनी आणि गेल्या महिन्यात १७ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे, परिणामी साखर आता ७० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. साखरेच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. साखरेचा पुरवठा बाजारात वाढवा यासाठी सरकार विविध पद्धतींचा वापर करत आहे. यासाठी सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर बाजारातील साठेबाजी हा प्रकार रोखण्यासाठी मर्यादादेखील घालून दिली आहे. तिसरे आणि महत्त्वाची बाब म्हणजे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत. १५ ऑक्टोबरपासून लवकर गाळप सुरू करण्यास देखील सांगितलं आहे.
यासगळ्यात वाढते साखरेचे दर या सगळ्यास कारणीभूत इथेनॉल असल्याचं टिकाकारांचं मत आहे. पण सरकारने यासगळ्या परिस्थितीला स्पष्टपणे नकार दिला आहे. सरकारच्या मते, साखरेच्या दरातील वाढ ही साठेबाजी आणि साठेबाजीच्या भीतीमुळे झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२१ ऑगस्ट रोजी कांद्यांचा भाव सरासरी ४०.७९ रुपये किलो इतका होता. एका आठवड्यापूर्वी हाच भाव ३६.५६ रुपयांवर आणि एका महिन्यापूर्वी ३४.८७ रुपयांवर होता. याचा अर्थ कांद्याच्या दरात ₹४ ते ५ प्रति किलोने वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर भावात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचं आकडेवारीत दिसून येत आहे. या भाववाढीचे मुख्य कारण म्हणजे नवीन खरीप कांद्याच्या पिकामध्ये आलेला व्यत्यय असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मान्सूनला झालेला विलंब आणि खरीप कांद्याच्या पेरणीवरही झालेला परिणाम या सगळ्याचा परिणाम कांद्यांच्या दरावर होत आहे. भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आपल्या बफर साठ्यातील कांद्याची विक्री करत आहे.
गेल्या महिन्याभरात तूर, मूग, उडीद आणि हरभरा यांसारख्या डाळींच्या दरात देखील वाढ दिसून आली आहेत. तब्बल १ ते २ रुपयांनी वाढ सांगण्यात आली असली तरीही ती सणासुदीच्या काळात फार मोठी वाढ असल्याचं समोर येत आहे. या दरवाढीमागे देखील मान्सूनला कारणीभूत मानलं जात आहे. आकडेवारीनुसार, यावर्षी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५,००० हेक्टरने कमी आहे. तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र १.६९ लाख हेक्टरने कमी आहे. अशा परिस्थितीत, कमी पावसामुळे डाळींचे भाव आणखी वाढू शकतात.
इतर गोष्टींच्या किमती कडडल्या आहेत तर मी तेल या सगळ्यात कसं मागे राहील? आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती या सध्या २० महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत. इंडोनेशिया हा पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. पण तेथील सुरु असलेली दुष्काळी परिस्थिती तेलाच्या किमती वाढण्यास कराणीभूत ठरत आहे. पाम तेल हे सर्वाधिक वापरले जाणारे खाद्यतेल आहे. भारत या तेलाची आयात करतो आणि सध्या आयातीत घट झाल्यामुळे त्याच्या किमती वाढत आहेत.
यासगळ्यासोबत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे जागतिक स्तरावरील देशातील प्रत्येक समस्येचं कारणं ठरत आहेत. भारताच्या शुद्ध तेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने सूर्यफूल तेलाची आयातही मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. इतकेच नव्हे तर, जागतिक बाजारातही खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.






