
(फोटो सौजन्य: pinterest)
Unemployment Rate: जगभरात महागाईचे आकडे खुपच बिघडत चालले आहेत. त्याचबरोबर भारताची आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात त्यात ५.५ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिलमध्ये ५.२ टक्के असलेला बेरोजगारीचा दर आता ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या ११ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? जाणून घेऊयात.
एप्रिलमध्ये ४.६ टक्के असलेला ग्रामीण बेरोजगारीचा दर आता ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, शहरी बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. पूर्वी ६.६ टक्के असलेला हा आकडा मे महिन्यात ६.४ टक्क्यांवर आला आहे. यावरून शहरांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचे दिसून येते. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, बेरोजगारीचा दर सलग चौथ्या महिन्यात वाढला आहे. गेल्या ११ महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
केवळ बेरोजगारीच वाढली नाही, तर काम करणाऱ्या लोकांचे प्रमाणही कमी झाले आहे. फोर्स पार्टिसिपेशन सहभाग दर एप्रिलमधील ५५ टक्क्यांवरून मे महिन्यात ५४.४ टक्क्यांपर्यंत घसरला. कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (WPR) देखील ५२.२ टक्क्यांवरून ५१.४ टक्क्यांपर्यंत घसरले. याचा अर्थ असा की, रोजगार निर्मितीचा वेग श्रम बाजारात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा मागे आहे.
अलीकडील आकडेवारी दर्शवते की ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी अत्यंत मर्यादित आहेत. तरुणांमध्येही बेरोजगारी ही चिंतेची बाब आहे. हे आता केवळ पुरुष आणि महिलांपुरते मर्यादित राहिलेले नाही; बेरोजगारीचा दर कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी धोका निर्माण करतो. वाढलेल्या रोजगारामुळे उत्पन्न वाढते, ज्यामुळे उपभोग आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळते. पण वाढत्या बेरोजगारीचा परिणाम ग्राहक खर्चावर होऊ शकतो आणि आर्थिक वाढीस अडथळा येऊ शकतो.