फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात कॉपीचे एकूण ४२ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार विविध विभागांमध्ये हे प्रकार नोंदविण्यात आले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकरणे आढळली आहेत.
अहवालानुसार अमरावती विभागात सर्वाधिक २२ गैरप्रकार नोंदविण्यात आले. त्यानंतर पुणे विभागात १० प्रकरणे आढळली. छत्रपती संभाजीनगर विभागात ३, नाशिक विभागात ४ तर लातूर विभागात २ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण या विभागांत एकही गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती मंडळाने दिली आहे. या विभागांतील परीक्षा प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
परीक्षा केंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उडती पथके, व्हिडिओ निरीक्षण व्यवस्था तसेच केंद्रप्रमुखांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू आहे. तरीही काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याचे समोर आले आहे. कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध मंडळाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका रद्द होण्याची शक्यता असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, इंग्रजी प्रश्नपत्रिकेदरम्यान राज्यातील सर्व विभागांत मिळून ४२ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. संबंधित उमेदवारांना नियमानुसार सुनावणीची संधी देण्यात येईल. तोपर्यंत त्यांना पुढील नियोजित परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. मंडळाने परीक्षेदरम्यान कडक नियंत्रण ठेवण्याचे धोरण अवलंबले असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेसाठी अत्यावश्यक असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.






