‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शरद पवार इन्सपायर फेलोशिप २०२६’ अंतर्गत, अक्षय दया मोहिते लिखित व ‘ललित प्रकाशन’ प्रकाशित ‘बिल्लाबाँग’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (NCPA) येथे दिमाखात पार पडला. प्रकाशन समारंभाला कवयित्री नीरजा, ज्येष्ठ समीक्षक मुकुंद कुळे, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ लेखक व संपादक अरुण शेवते, प्रा. मंगेश बनसोड, लेखिका प्रा. श्यामल गरुड, लेखक व अनुवादक डॉ. श्रीधर पवार, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे दिग्दर्शक विजय कळमकर, कवी अविनाश गायकवाड, कवी व कादंबरीकार अविनाश उषा वसंत, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप कोकरे, कवयित्री लक्ष्मी यादव, पत्रकार सुबोध मोरे, साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, पत्रकार निलेश बने आणि ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट ( NCPA ) प्रलेखन अधिकारी डॉ सुजाता जाधव यांसह साहित्यिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास नार्वेकर, सुधीर चित्ते यांनी कादंबरीच्या काही भागाचे अभिवाचन केले.
समीक्षक मुकुंद कुळे म्हणाले, “ही कादंबरी भाऊ पाध्ये आणि जी. के. ऐनापुरे यांच्या भाषेला पुढे नेणारी असून, निमशहरी संस्कृतीतील तरुणांचे विश्व प्रकर्षाने मांडते. सध्याच्या मराठी साहित्यात ही कादंबरी भाषेचे सर्व पारंपरिक संकेत तोडत आपले म्हणणे प्रखरपणे मांडते. ही कादंबरी वाचताना एखादी दर्जेदार ‘वेब सीरिज’ पाहत असल्याचा अनुभव येतो.”
ज्येष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, “अक्षय दया मोहिते यांची ही कादंबरी सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्ष भेदकपणे समोर ठेवते. बहुजन-अभिजन या भेदांच्या पलीकडे जाऊन, पारंपरिक चौकटी मोडीत काढत ही कादंबरी बंडखोरपणे भाष्य करते. भाऊ पाध्ये यांच्यासारखे लेखन करण्यासाठी लागणारी ‘धमक’ आजच्या पिढीतील लेखकांकडे आहे, हे या कादंबरीतून सिद्ध होते.”






