फोटो सौजन्य- सौशल मीडिया
Decline of Mughal Empire: कधीकाळी ‘सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतावर परकीय आक्रमकांनी जवळपास ३०० वर्षे राज्य केले. बाबरपासून सुरू झालेली सल्तनत हुमायून, अकबर, जहांगीर आणि शाहजहान यांसारख्या बादशहांच्या काळात वैभवाच्या शिखरावर पोहोचली. परंतु, एक काळ असा आला की, हे मुघलांचे बलाढ्य साम्राज्य कुमकुवत होऊ लागले. पण इतके काळ वर्चस्व गाजवणारी मुघल सत्ता संपुष्टात कशी आली? जाणून घेऊया यामागचा इतिहास..
भारतात मुघल सत्तेचा पाया वर्ष १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर रचला गेला. बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करून येथे मुघल वंशाची स्थापना केली. यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान यांसारख्या शासकांनी हे साम्राज्य अधिक मजबूत केले. विशेषत: अकबरच्या काळात मुघल सत्ता सर्वोच्च शिखरावर होती. यावेळी प्रशासन सैन्य आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली होती. परंतु नंतरच्या दशकात सत्ता संघर्षामुळे साम्राज्याचा पाया कुमकुवत होऊ लागला.
औरंगजेबच्या काळात (१६५८ ते १७०७) मुघल साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. परंतु, खऱ्या पतनाची सुरुवात येथूनच झाली. औरंगजेबच्या कडक धोरणे आणि धार्मिक मोहिमांमुळे मराठा, शीख आणि राजपूत यांसारखे शक्तीशाली गट त्याचे कट्टर शत्रू बनले. तसेच यांच्यातील सातत्यपूर्ण सत्तासंघर्षामुळे मुघलांचा खजिना रिकामा होऊ लागला. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची सत्ता दरबारी आणि सरदारांच्या हातात जाऊ लागली.
याच काळात मराठ्यांनी मुघलांचे प्रदेश जिंकून घेत दिल्लीपर्यंत आपली ताकद दाखवून दिली. यामुळे मुघलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्यानंतर १७३९ मध्ये पर्शियाचा शासक नादिर शाह याने कर्नालच्या लढाईत मुघलांचा पराभव केला आणि दिल्लीत प्रचंड लूटमार केली. त्यांनी कोहिनूरच्या हिऱ्यासह अफाट संपत्ती लूटली होती. यानंतर अहमद शाह अब्दालीने १७४८ ते १७६७ दरम्यान भारतावर अनेकदा आक्रमणे केली. या आक्रमणांमुळे मुघल सत्ता पूर्णपणे जेरीस आली.
मुघल पूर्णपणे कुमकुवत झाली असताना ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. १७५७ ची प्लीसीची लढाई आणि १७६४ ची बक्सारची लढाई जिंकल्यावर इंग्रजांनी मुघल बादशहा शाह आलम दुसरा याला नियंत्रणाखाली घेतले. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते, यानंतर मुघल बादशहा नावापुरते शासक राहिले. पुढे १८५७ च्या लढ्यात बहादूर शाह जफरला बंडखोरांचा मुख्य नेता बनवण्यात आले. परंतु इंग्रजांनी हा उठाव मोडून काढून त्याला कैदेत ठेवले आणि १८६२ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुघल राजवटीचा अधिकृतपणे शेवट झाला.






