फोटो सौजन्य - Social Media
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून, या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबवले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये ही निवडणूक होत आहे. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने, शालेय संस्थांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्या विकास शाळेने यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना थेट जनजागृतीच्या कामात सहभागी करून घेतले. नेरळ गावात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर रांगोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. ‘मतदान हा तुमचा हक्क आहे’, ‘एक मत – मजबूत लोकशाही’ अशा आशयाच्या संदेशांनी सजवलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकात काढण्यात आलेल्या या रांगोळ्यांमुळे मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यासोबतच शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना जागरूक केले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यातून मतदान न केल्यास होणारे परिणाम, लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व आणि प्रत्येक मताचे मूल्य प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी नेरळ गावातील विविध चौकांमध्ये फिरत हे पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयाने आणि सोप्या भाषेतील संदेशामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढताना दिसून आली. अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेच्या या उपक्रमामुळे नेरळ गावात मतदानाचा टक्का वाढण्यास निश्चितच मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकशाहीचे मूल्य लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण न देता सामाजिक जाणीव निर्माण करणे ही शिक्षणाची खरी भूमिका असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्या विकास शाळेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढली असून, गावपातळीवर लोकशाही प्रक्रियेला बळ मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.






