सौजन्य - नवराष्ट्र टीम
शहरातील ४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. ही योजना वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या तसेच शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याची कडक ताकीद संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आली.
विकासकामांना गती देण्याचे निर्देश
बैठकीत बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरण न करण्याबाबत भूमिका मांडण्यात आली. जैन मंदिर येथील आरक्षण तत्काळ काढणे, महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करणे, दत्त मंदिर परिसरात अभ्यासिका उभारणे तसेच ‘नमो उद्यान’ अंतर्गत शहरातील मोकळ्या जागांचे व नव्या उद्यानांचे सुशोभीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
याशिवाय वैकुंठरथ व्यवस्था, बसस्टॉप दुरुस्ती, ओपन जिम, भाजी मंडई उभारणी आणि शहरभर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नागरी प्रश्नांवर चर्चा, शहरातील वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, अतिक्रमणे आणि कातवी येथील स्मशानभूमीचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. या समस्यांवर तातडीने पर्याय शोधून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शहरात हॉकर्स झोन निर्माण करणे, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, क्रीडांगण व अद्ययावत गार्डन उभारणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ तयार करण्यासाठी तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य दिले जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा अबोली ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, अनंता कुडे दिनेश ढोरे, संदीप म्हाळसकर विशाल वहिले, गणेश म्हाळसकर अजय म्हाळसकर मंगेश धडवले,अर्चना म्हाळसकर, सुनिता ढोरे माया चव्हाण, पुनम भोसले, रूपाली ढोरे ,राणी म्हाळसकर, सारिका चव्हाण, वैशाली सोनवणे अजय भवार,आकांक्षा वाघवले, यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.






