24 तासांनी उलगडले आंबेनळी घाटातील मृत्यूचे रहस्य; मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा (संग्रहित फोटो)
पाचगणी : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना या अपघातामागील थरारक आणि धक्कादायक घटनाक्रम आता समोर आला आहे. स्कॉर्पिओ कार तब्बल ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात तब्बल २४ तास कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मुलांचे फोन बंद लागणे, कुटुंबीयांची वाढती चिंता, मोबाईल लोकेशनचा तांत्रिक मागोवा आणि दरीत सुरू झालेली रात्रभर शोधमोहीम…या सर्वांनंतर अखेर मृत्यूचे हे भयावह रहस्य उलगडले.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रितेश लोखंडे याच्या वडिलांना मुलांशी संपर्क होत नसल्याने संशय आला. रविवारी पहाटेपासूनच त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून मुलांचा शोध सुरू केला. बराच वेळ उलटूनही कोणाचाही संपर्क होत नसल्याने अखेर पोलादपूर पोलिसांकडे धाव घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत संबंधित युवकांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन शोधून काढले.
तपासादरम्यान सर्व मोबाईलचे शेवटचे लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाट परिसरात दिसून आले. त्यानंतर पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. घाटातील धोकादायक वळणे आणि रात्रीचा प्रवास लक्षात घेता वाहन दरीत कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात आली. लगेचच ट्रेकर्स आणि बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.
मित्रांसोबत पोहणे बेतले जीवावर; डोहात पोहत असताना तरुणाचा पाय घसरला अन् बुडून मृत्यू झाला
सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि स्थानिक बचाव पथकांनी रात्रीच शोधमोहीम सुरू केली. मात्र, दरी इतकी खोल आणि परिसर इतका धोकादायक होता की, प्रत्येक पाऊल जीवावर बेतणारे होते. शोधमोहीम सुरू असताना दरीत एक कार दिसून आली आणि काही क्षणांसाठी सर्वांनाच वाटले की तीच हरवलेल्या युवकांची स्कॉर्पिओ असावी. मात्र, जवळ जाऊन पाहणी केली असता ती कार जुन्या अपघातातील असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला. मात्र, पोलिस आणि ट्रेकर्सनी हार मानली नाही.
पुन्हा एकदा अधिक खोल भागात शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी दाट झाडी आणि खडकांच्या मधोमध खोल दरीत चुराडा झालेली स्कॉर्पिओ दिसून आली. गाडीची अवस्था पाहून बचाव पथकही हादरून गेले. वाहनातील सर्व आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रात्रीचा अंधार, खोल दरी आणि धोकादायक उतार यामुळे तत्काळ मृतदेह वर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण रात्र दरीतच शोध आणि पाहणी सुरू ठेवण्यात आली.
सोमवारी पहाट होताच ट्रेकर्सनी पुन्हा मोहीम सुरू केली. दोरखंडाच्या सहाय्याने स्ट्रेचर दरीत उतरवण्यात आले आणि एकामागोमाग एक मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. या संपूर्ण घटनाक्रमाने पोलिस, ट्रेकर्स आणि स्थानिक नागरिकांनाही हादरवून सोडले आहे.
मोबाईल लोकेशनमुळे दुर्घटनेचा उलगडा
कोकण सहलीसाठी गेलेल्या या आठ मित्रांचा आनंदी प्रवास एका क्षणात मृत्यूच्या दरीत संपला, तर २४ तास त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या लेकरांवर कोणता काळ ओढावला आहे याची कल्पनाही नव्हती. मोबाईल लोकेशनमुळे अखेर या दुर्घटनेचा उलगडा झाला, पण तोपर्यंत काळाने आठ कुटुंबांचा आधार हिरावून नेला होता.






