फोटो सौजन्य : Zee 5
किती सर्हासपणे म्हटलं जातं आणि तसं अनुभवलं पण जात की बाईच बाईचे पाय खेचते. पण नाण्याला दोन बाजू असतात. अशाही काही बायका असतात जिथे म्हणावं वाटतं बाईच बाईला समजून घेते. ‘तिघी’ सिनेमा नाण्याची दुसरी बाजू आहे. हा सिनेमा फक्त मातृत्व नाही बाईपण समजून सांगणारा वाटतो. पण असं असलं तरी सिनेमा कुठेही सो कोल्ड फेमिनिझमला पाठिंबा देणारा नाही वाटला. सगळं अगदी साधं आणि खूप खरं वाटणारी अशी तिघींची गोष्ट. या तिघी एकमेकींशी भयानक भांडतात पण तरीही यांच्यात एक धागा जोडून आहे. प्रेमाचा, खरेपणाचा. या तिघांना कधी जज करताच येणार नाही कारण प्रत्येक जण जिच्या तिच्या ठिकाणी योग्य आहे.
एक खमकी आई जिने दोन मुलींना मोठ्या मेहनतीने वाढवलं.आईच्या आजारपणात आपली स्वप्नं करिअर जेव्हा बाजूला पडतं तेव्हा होणारी घुसमट आजची प्रत्येक मुलगी हे समजू शकते. तेव्हा सारिकाची होणारी चिडचिड तिचा त्रागा सगळं आजची प्रत्येक मुलगी अनुभवते. आणि दुसऱ्या स्वाती एक. स्वतःच घर सांभाळताना अनेकदा प्रोफेशनल लाईफमध्ये एका बाईच्या असाह्यतेचा गैरफायदा घेणारे अनेक जण आहेत. त्यांच्याशी डील करताना काय मानसिक ताण येत असेल हे नेहा पेंडसेने कमाल साकारलंय. भारती आचरेकर म्हटलं की पहिले चेहऱ्यावर खूप हसू येतं कॉमेडी क्वीन म्हणून त्यांची मनावर एक ठसठशीत छाप पडली आहे. पण हेमलता रानडे या व्यक्तिरेखेने मात्र सगळ्या सीमा तोडल्या. काय कमालीचं काम केलंय भारती आचरेकरांनी.
आपल्याकडे फार वेळ नाही, हळूहळू शरीरातील एक एक अवयव कमकुवत होत जाणार पण ते दुख माझ्यापुरतं राहुदेत त्या आठवणी माझ्या मुलींच्या मनात नको. तुमची खमकी आई हीच माझी इमेज रहावी म्हणून हॉस्पिसचा हेमलता रानडेने धरलेला हट्ट. या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेम या तिघींची गोष्ट सांगतात. सारिका, स्वाती आणि तिची आई यांच्यातला एक प्रसंग आहे त्यावेळेचं एक वाक्य अंगावर काटा आणतो. ‘मी जगण्यापासून पळत नाहीये dignity ने निरोप घेतेय’. काय कमाल संवाद लिहिलाय. आपल्या माणसांचं प्रेम मिळावं पण सहानुभूती संवेदनशील माणसाला मारतेच. मुलींचं प्रेम हेच पुरेसं आणि पण आजारपणात मिळणारी सहानुभुती किंवा त्यांच्या नजरेत आईचं हळूहळू ढासळणं नको म्हणून हेमलता रानडे यांनी धरलेला हॉस्पिसला हट्ट.
गैरसमजातून विकोपाला गेलेली भांडणं आणि पुन्हा संवादातून घट्ट झालेलं तिघींचं जग. जशी कणखर आई तशाच तिच्या लेकी. “पाठीचा कणा ताठ ठेवा गं जिथे तुम्ही टेकताय ती भिंत ढासळतेय” असं म्हणणारी आई भारती आचरेकरांनी सुंदर रित्या साकारली. सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे या सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहेत पण या सिनेमात ना सोनाली दिसली ना नेहा. दिसल्या त्या फक्त सारिका आणि स्वातीच. प्रत्येक सिनेमा एक गोष्ट सांगतो आणि हा सिनेमा पुन्हा हेच सांगतो की, बाईच बाईला जास्त कळते. तीन अभिनेत्रींनी जसं त्यांच्या व्यक्तिरेखेचं सोनं केलं तसंच काळजाचा ठाव घेणारं जितेंद्र जोशींचे शब्द आणि त्याला संगीत दिलंय निलेश मोहरीरने. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राला बोलकं करणारे प्राजक्त देशमुखचे संवाद सगळं अगदी कमाल जुळून आलंय.उत्कृष्ट कथानक आणि तिघींना एका फ्रेममध्ये सुंदरपणे गुंफणारी कमाल दिग्दर्शिका. या सिनेमाच्या इंडस्ट्रीला जीजिवीषा काळे सारखी खुप सुंदर दिग्दर्शिका मिळाली. या सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी झेप घेतली.
अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “
सिनेमा का पाहावा तर , या तिघींच जग सरतेशेवटी डोळ्यात पाणी आणतं. कारण आईबरोबर लेक कितीही भांडली तरी प्रत्येक लेकीसाठी आई हळवा कप्पा असतेच. बऱ्याचदा होतं काय तर, आपल्याला माहित असतं आपली माणसं कितीही भांडली तरी सोबत आहेत पण या विश्वासामुळे कधी कधी नकळतपणे आपण त्यांना गृहीत धरतो आणि सांगायचं राहून जातं की, तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहात. स्पेशली हे आईला शब्दातून सांगायचं राहून जातं. या सिनेमाने पुन्हा आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्याची जाणीव करून देतं आणि पुन्हा पुन्हा सिनेमा हेच सांगतो की, बाईच बाईला कळते.






