सौजन्य - सोशल मिडीया
नागपूर : नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी पाटेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाच्या यशस्वी 25 वर्षांच्या निमित्तानं या परिषदचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाना पाटेकर यांनी केलेले विधान संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. “मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो,” असे म्हणत नाना पाटेकर यांनी उपस्थितांना चक्रावून सोडले. मात्र, त्यांच्या या विधानापाठीमागे कोणतीही नाराजी नसून, दुर्गम भागातील लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ असल्याचे स्पष्ट झाले. “डोंगर खेड्यात काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असा विचार मनात येतोय,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे नाना पाटेकर म्हणाले, “मी शहरात जास्त काळ राहूच शकत नाही. तिथे मला शहरातील भिंती कबरीसारख्या वाटू लागतात. माझे मन गाई, कुत्रे आणि शेतात रमते. आज कोरडवाहू शेतकऱ्याला किती अतोनात त्रास सहन करावा लागतोय, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जन्मापासून मोफत श्वास घेतोय, निसर्गाने कधी एक रुपयाही मागितला नाही, याचे भान ठेवले पाहिजे. म्हणूनच आता मी केवळ गावागावात भटकत राहण्याचे ठरवले आहे” असे नाना पाटेकर म्हणाले.
आपण सर्व नागरिक म्हणून एकच
“आपण कोणी राजकीय पक्ष नाही. सरकारला जे करायचे आहे ते ते ठरवतील,” असे स्पष्ट करत त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अजूनही केवळ अंशतः सुरू असल्याकडे लक्ष वेधले. भाजप असो वा काँग्रेस, दोन्ही पक्ष आणि त्यांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी सामाजिक प्रश्नांवर आपण सर्व नागरिक म्हणून एकच आहोत. चळवळी या केवळ भाषणापुरत्या मर्यादित न राहता, प्रत्यक्षात कृतीत उतरल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“लहान गावांमध्ये राहणारी मुले आज मोठी शहरे सांभाळत आहेत, ग्रामीण भागात खूप काम करण्याची गरज आहे,” असे सांगत नानांनी भाषणाचा शेवट सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तात्पुरते सुख-दुःख क्षणिक असते, पण एकत्र येऊन काम केले तर मोठे बदल घडवता येतात, हा संदेशही पाटेकर यांनी दिला.






