( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये आता भक्ती, भावनिक क्षण आणि रंजक घडामोडींचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. ब्रह्मास्त्राच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी देवी तुळजाने बालिकेचे रूप धारण केले आहे. त्याचवेळी वैकुंठात श्रीहरींच्या आनंदाश्रूतून एका तेजस्वी बाळकाचा जन्म झाला असून, त्याचं नाव ‘हरी’ आहे.
आता नियतीच्या संकेताने बालतुळजा आणि हरी यांची महालात पहिली भेट होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांमध्ये बहीण-भावाचं हे दैवी नातं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तुळजा आणि हरी एकत्र आल्यानंतर वाड्यात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, हरीच्या खोडकर लीला बालतुळजेची परीक्षा घेताना दिसतील. दोघांमधील गोड खोड्या, आव्हानं आणि भावंडांमधील नात्याचे खास क्षण आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
हरी नक्की कोण आहे आणि त्याचा महालात येण्यामागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध बालतुळजा कसा घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मालिकेत पाताळदेवीच्या आज्ञेने चेलप्पा आत्याचं रूप घेऊन देवीभक्त सखूला मानसिक त्रास देत आहे. मात्र, बालतुळजेने नागपंचमीची कथा सांगून सखूच्या मनात भक्ती आणि विश्वासाची नवी ज्योत निर्माण केली.
सखूच्या खऱ्या भक्तीने प्रसन्न होऊन नागराजांनी तिला साक्षात दर्शन दिलं. त्यामुळे चेलप्पाची मायावी शक्ती काही काळासाठी क्षीण झाली आहे.
दुसरीकडे, शुंभाने सोडलेलं ब्रह्मास्त्र बालिकेच्या रूपातील तुळजेवर निष्प्रभ ठरलं आहे. त्यामुळे शुंभाचा डाव फसला. आता तुळजा आणि हरीच्या भेटीमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे.
बालतुळजा आणि बाळ हरी यांच्या आगमनाने ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.






