(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता Rohit Parshuram पुन्हा एकदा झी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत तो ‘शंकर’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
या नव्या प्रवासाबद्दल बोलताना रोहितने आपल्या पात्राविषयी सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, “मी शंकर हे पात्र साकारतोय. गावातील सावकार मातोश्रींचा मुलगा, व्यायामाची प्रचंड आवड असलेला आणि कोल्हापूरच्या मातीतला रांगडा गडी अशी त्याची ओळख आहे. तो एका बिनधास्त, सुंदर आणि मनमोकळ्या मुलीला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल, प्रेम आणि आई यांच्यामध्ये समतोल साधताना होणारी त्याची गोड दमछाक आणि त्याचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.”
रोहितच्या मते, शंकर हे पात्र केवळ रांगडेपणापुरते मर्यादित नसून त्यामध्ये भावनिक पैलूही आहेत. प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंध यांच्यातील संघर्ष अनुभवणाऱ्या या पात्राचा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.‘कृष्णाईच्या लेकी’मधील या नव्या भूमिकेत रोहित परशुराम कोणता नवा रंग दाखवतो, याची उत्सुकता आता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.
ऑडिशनच्या आठवणी सांगताना रोहित म्हणाला, “मी ‘कमळी’च्या सेटवर आदित्यला, म्हणजेच बंड्याला भेटण्यासाठी सहज गेलो होतो. त्यावेळी दिग्दर्शक Aniket Sane झी मराठीवर नवी मालिका घेऊन येत असल्याचं समजलं आणि त्यासाठी ऑडिशन्स सुरू होत्या. मी लगेच त्यांना भेटलो आणि ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक राऊंड्स, सीन वर्क आणि विविध चाचण्या झाल्या. अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता.”
‘शंकर’ या कोल्हापुरी तरुणाच्या भूमिकेसाठी तो विशेष मेहनत घेत असल्याचंही रोहितने सांगितलं. “मी कोल्हापुरी भाषा आणि तिचा खास लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर नियमित व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्लेचं सखोल वाचन करत आहे, जेणेकरून शंकर हे पात्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन ते प्रामाणिकपणे साकारता येईल,” असं तो म्हणाला.
जवळपास सव्वा वर्ष हिंदी नाटकात काम केल्यानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने तो भावूक झाल्याचंही त्याने नमूद केलं. “साताऱ्याशी माझं एक खास नातं आहे आणि या मालिकेचा मुहूर्तही साताऱ्यात झाला. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या शूटिंगला आनंद, उत्सुकता आणि भावुकता अशा अनेक भावना मनात होत्या. तो दिवस माझ्यासाठी कायम स्मरणात राहील,” असे रोहितने सांगितले.
मालिकेच्या चित्रीकरणाबाबत बोलताना तो म्हणाला, “शूटिंग मुंबईबाहेरील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात सुरू आहे. गावाकडचं वातावरण, हिरवाई, मोकळी हवा आणि तिथली साधी माणसं यामुळे काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. अशा वातावरणात शंकरसारखं पात्र जगणं अधिक सहज होतं. संपूर्ण टीमसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरत आहे.”
ज्येष्ठ अभिनेत्री Nivedita Saraf यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने मनातील भावना व्यक्त केल्या.
रोहित म्हणाला, “निवेदिता सराफ ताईंच्या प्रोजेक्टमध्ये मी फक्त हातात भाला घेऊन उभा असतो तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. पण इथे तर मी मुख्य नायकाची भूमिका करतोय. त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. त्यांच्यासोबत सेटवर वावरताना माझा संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो आणि मेहनतीला देव फळ देतो यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो.”
मालिकेतील इतर कलाकारांबद्दलही त्याने कौतुक व्यक्त केले. “Smita Saravade, Sanjay Narvekar आणि इतर सर्व कलाकार अतिशय अनुभवी आणि सहकार्य करणारे आहेत. त्यामुळे एका यशस्वी मालिकेचा भक्कम पाया रचला जात असल्याची जाणीव सतत होत राहते,” असे तो म्हणाला.
निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळताच आपण अक्षरशः प्रार्थना करू लागलो होतो, असा खुलासाही रोहितने केला. “ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता ताई या मालिकेत आहेत, त्या दिवसापासून मी मारुतीरायाकडे ही मालिका मिळावी म्हणून प्रार्थना करत होतो. त्यांचा अनुभव, अभिनयातील सहजपणा, गोडवा आणि मनमोहक हास्याने गेली चार दशके महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव असणार आहे,” असे त्याने सांगितले.
याशिवाय आपल्या आधीच्या भूमिकेची आठवण काढत रोहित म्हणाला, “प्रेक्षकांनी अर्जुनला तीन वर्षे अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि भरभरून प्रेम दिलं. आता शंकरलाही ते तितकंच प्रेम देतील, याची मला खात्री आहे. साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर हे मला जणू भावंडांसारखे वाटतात. ही दोन्ही पात्रं माझ्या खूप जवळची आहेत.”
‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुननंतर आता ‘कृष्णाईच्या लेकी’मधील शंकरच्या रूपात रोहित परशुराम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शंकरचा स्वभाव, त्याचा संघर्ष आणि त्याचा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.






