संग्रहित फोटो
पुणे/ गायत्री पवळे : एकेकाळी मंदिर, रंगमंच आणि शास्त्रीय परंपरेपुरते मर्यादित मानले जाणारे नृत्य आज नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम बनले आहे. भरतनाट्यम, कथक, ओडिसी यांसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांपासून ते समकालीन, हिप-हॉप आणि फ्युजनपर्यंतचा प्रवास केवळ कलात्मक न राहता सामाजिक बदलांचेही प्रतिबिंब ठरत आहे. शहरांपासून छोट्या गावांपर्यंत नृत्यसंस्कृतीची ही नवी लाट स्पष्टपणे जाणवत असून, कथक आणि भरतनाट्यम शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
कथकसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारात अंगभूत शिस्त, भाव, मुद्रा आणि कथनपरंपरा यांना आजही तेवढेच महत्त्व आहे. मात्र नव्या पिढीने या परंपरेला जपत त्यात स्वतःची मांडणी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी पारंपरिक रचनांसोबतच सामाजिक विषय, स्त्री-अस्मिता, पर्यावरण, मानसिक आरोग्य आणि आधुनिक जीवनशैली यांसारख्या विषयांवर आधारित नृत्याविष्कार सादर होताना दिसत आहेत. नृत्य शिकण्याकडे आता केवळ छंद म्हणून न पाहता करिअर, फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था आणि खासगी अकॅडमींमध्ये नृत्यवर्गांची संख्या वाढली असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलाला अधिक गती मिळाली आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमधूनही कलाकार आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत.
नृत्य हे संस्कृतीचे जिवंत माध्यम
या बदलाचा सर्वात ठळक चेहरा म्हणजे फ्युजन नृत्यप्रकार होय. कथ्थकच्या अर्धमंडलीतून जॅझचा टेम्पो, कथकच्या चक्रांमध्ये समकालीन नृत्याची लय किंवा लोकनृत्यांच्या ठेक्यावर आधुनिक बीट्स—अशा प्रयोगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंपरा आणि प्रयोग यांचा हा संगम तरुण कलाकारांना अधिक जवळचा वाटतो. तज्ज्ञांच्या मते, नृत्यसंस्कृतीत होत असलेले हे बदल स्वागतार्ह असले तरी शास्त्रीय नृत्याचा पाया भक्कम राहणे अत्यंत आवश्यक आहे. फ्युजनची लोकप्रियता वाढत असताना शास्त्रीय नृत्याची गहनता, साधना आणि तांत्रिक शिस्त टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात नृत्य हे केवळ मनोरंजन किंवा रंगमंचावरील सादरीकरण न राहता ओळख, संवाद आणि संस्कृतीचे जिवंत माध्यम बनले आहे. घुंगरांच्या नादात परंपरेची चाहूल आणि नव्या तालात बदलत्या काळाची चाहूल अनुभवायला मिळत आहे.
“पूर्वी कथक नृत्य शिकण्यासाठी संयम अत्यावश्यक मानला जात होता; मात्र सध्याच्या पिढीत तो संयम कमी होताना दिसतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पटकन शिकणे, पटकन परीक्षा देणे आणि प्रमाणपत्र मिळवणे याकडे अधिक कल आहे. शास्त्रीय नृत्य ही साधना असून त्यासाठी चिकाटी आवश्यक असते. त्यामुळे कथकसोबत आजकाल कथक फ्युजनचाही कल वाढताना दिसतो.” — निकिता अविनाश कराळे, कथक शिक्षिका
हे सुद्धा वाचा : दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन






