ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कोलकातामधील सात मतदारसंघाकडे भाजपचे लक्ष आहे (फोटो - istock)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, यावेळी मतदान केवळ दोन टप्प्यांत होणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्याबरोबरच, दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सात विधानसभा जागांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा परिसर दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसचा सर्वात सुरक्षित आणि अभेद्य किल्ला मानला जातो, या मतदारसंघामध्ये सध्या टीएमसीकडे सर्व सात जागा आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने देखील कंबर कसली आहे. भाजप हा बालेकिल्ला भेदण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. अनेक आकर्षक आश्वासने आणि विकासकामांची स्वप्ने दाखवली जात आहे.
हे देखील वाचा : LPG Gas तुटवड्यात काळाबाजार जोरात; दिल्लीमध्ये छाप्यात 62 अवैध सिलेंडर ताब्यात
भवानीपूर: मुख्यमंत्री ममता दीदींचे निष्ठावान मतदार
दक्षिण कोलकातामधील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ असलेला भवानीपूर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे घर म्हणून ओळखला जातो. २०११ मध्ये सत्तांतर झाल्यापासून टीएमसी या मतदारसंघात कधीही हरलेली नाही. निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, जेव्हा ममता बॅनर्जी स्वतः येथे निवडणूक लढवतात, तेव्हा त्यांना प्रचंड मतदार पाठिंबा मिळतो. लोकसभा निवडणुकीत भाजप येथे कधीकधी कडवी झुंज देत असला तरी, ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेमुळे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला वरचढ होण्याची शक्यता आहे.
बेहालाच्या दोन जागा उत्तराधिकाऱ्यांचा शोध
बेहाला भागातील पूर्व आणि पश्चिम या दोन जागा टीएमसीसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या राहिल्या आहेत. बेहाला पश्चिम मतदारसंघ हा नेहमीच टीएमसीच्या पाठीशी राहिला आहे. याठिकाणी पार्थ चॅटर्जी सातत्याने विजयी होत आले आहेत. मात्र, शिक्षक भरती घोटाळ्यानंतर, पार्थ चॅटर्जी यांच्या योग्य उत्तराधिकाऱ्याचा शोध घेणे हे पक्षापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. येथे भाजप मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला आहे. २००१ पासून टीएमसीचा बालेकिल्ला असलेल्या बेहाला पूर्व जागेवर २०२१ मध्ये रत्ना चॅटर्जी विजयी झाल्या होत्या. मात्र, भाजपच्या वाढत्या मतांच्या टक्केवारीमुळे सत्ताधारी पक्षासाठी चिंता वाढली आहे.
रासबिहारी आणि कसबामध्ये भाजपचे थेट आव्हान
दक्षिण कोलकातामधील रासबिहारी जागा टीएमसीने १९९८ च्या पोटनिवडणुकीपासून राखली आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे टीएमसी सावध झाली आहे, कारण भाजपने तेथे आपली पकड लक्षणीयरीत्या मजबूत केली आहे, ज्यामुळे २०२६ ची लढत अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जावेद अहमद खान गेल्या तीन निवडणुकांमध्ये अपराजित राहिले आहेत, परंतु भाजप मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान पक्के करून आहे.
हे देखील वाचा : भारतीय रेल्वे होतेय ‘मालामाल’, 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला महसूल; आता सवलतींकडे सर्वसामान्यांची आशा
कोलकाता पोर्ट आणि बालीगंज हे टीएमसीचे आश्वासक
कोलकाता पोर्ट मतदारसंघातून ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री फिरहाद हकीम यांचे २०११ पासून या भागात वर्चस्व आहे. त्यांनी गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला असून, २०२६ मध्येही आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत.
कोलकाताच्या सर्वात उच्चभ्रू भागांपैकी एक असलेल्या बालीगंजमध्ये, टीएमसी २००६ पासून अपराजित राहिली आहे. सुब्रता मुखर्जी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बाबुल सुप्रियो विजयी झाले होते. सध्या तरी, भाजप आणि डावी-काँग्रेस आघाडी येथे टीएमसीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या स्थितीत दिसत नाहीत.






