जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या एका विधानाचा खरपूस समाचार घेतला. माझ्याकडे देखील एक चांगली स्कीम असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना देव आणि मुस्लिमांना अल्लाह भेटेल’ असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी म्हटलं आहे.
भाजपने 2014 आणि 2019 मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत आणि आता 2024 मध्ये 2047 पर्यंत विकसित देश बनवू असं सांगत आहेत, असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी सांगितलं. सध्या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जोधपूरचे खासदार आहेत. त्यांनी येथून गेल्या निवडणुकीत अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने येथून करण सिंह उचियारडा यांना तिकीट दिलं आहे.
उचियारडा म्हणाले की, 2047 मध्ये शेखावत 80 वर्षांचे होतील आणि मोदीजी 100 वर्षांचे होतील. गजेंद्र सिंह शेखावत यांनी ठरवलं आहे की, जर याच आधारावर मत द्यायचं असेल तर माझ्याकडे खूप चांगली स्कीम आहे. ती हिंदूंसाठीही आहे आणि मुस्लिमांसाठीही आहे. मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बनवणार आहे.






