Keralam Opinion Poll 2026: कोण होणार केरळचा किंगमेकर? जनमत चाचणीत धक्कादायक आकडेवारी समोर
Keralam Opinion Poll 2026: केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडांवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी गुरूवारी (९ एप्रिल)ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर पुढच्या महिन्यात ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. केरळच्या १४० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या अगदी आधी, जनमत चाचण्यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अशातच केरळमध्ये कोणाचे सरकार येणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. केरळमध्ये झालेल्या मॅटराइज सर्वेक्षणानुसार, राज्यात कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत (७१ जागा) मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला ६२-६८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ६७-७३ जागांसह सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयास येऊ शकते. या अटीतटीच्या निवडणुकीत, एनडीए ५-८ जागा जिंकून बाजी पलटवू शकते. जर विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली, तर सत्तेची सूत्रे काही मोजक्या जागांच्या हातात असतील, ज्या किंगमेकरची भूमिका बजावतील.
सर्वात मोठी वाढ एनडीएच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. ज्यात एनडीएला १५% मतांचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. २०२१ च्या निवडणुकीत, एलडीएफने ९९ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता, तर एनडीएला आपले खातेही उघडता आले नव्हते.
पण यावेळी, १५% मतांच्या वाट्यासह, एनडीएमध्ये राज्याच्या निवडणुकीच्या निकालावर खोलवर प्रभाव टाकण्याची ताकद आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, एकीकडे एलडीएफ आपल्या ‘प्रगती अहवाला’च्या आधारे हॅट-ट्रिक साधण्याचे लक्ष्य ठेवत आहे, तर दुसरीकडे यूडीएफ आपला १५ वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यावेळीही केरळच्या भौगोलिक राजकारणात उत्तर आणि दक्षिण यांच्यात स्पष्ट विभागणी दिसून येत आहे.
मलबार प्रदेश: येथे यूडीएफ मजबूत स्थितीत असून २५-२७ जागा जिंकू शकते, तर एलडीएफला २०-२२ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
दक्षिण केरळ: या प्रदेशात डाव्या पक्षांचा बालेकिल्ला अभेद्य राहिला आहे. एलडीएफला २३ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज असून, यूडीएफला २० ते २३ जागा मिळू शकतात.
४ मे रोजी मतमोजणी झाल्यावर तिरुवनंतपुरमची जागा कोणाला मिळेल, हे या प्रादेशिक संतुलनावरूनच ठरेल.
निवडणूक प्रचार आज संपला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी भाजप आणि सीपीआय(एम) यांच्यात ‘तडजोड’ झाल्याचा आरोप केला आहे, तर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी त्यांच्या सरकारने २०२१ ची ९७% आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही एनडीएच्या उमेदवारांसाठी रोड शो आयोजित करून वातावरण तापवले आहे. राज्यातील २.७१ कोटी मतदार आता ९ एप्रिल रोजी ईव्हीएमद्वारे मतदान करून ८९० उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.






