Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतरच संबंधित जागेची पाहणी केली जाते. त्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अंतर्गत वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी घेऊन पुढील कारवाई केली जाते. मात्र शहरात एकूण किती धोकादायक झाडे आहेत? ती कोणत्या भागात आहेत किंवा त्यांचा धोका किती आहे? याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील जुन्या, वयोवृद्ध, आतून पोकळ झालेल्या किंवा वीजवाहिन्यांच्या संपर्कात आलेल्या झाडांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येते का? याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील झाडांच्या फांद्या नियमित छाटल्या जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. तसेच रस्त्यालगत धोकादायक अवस्थेतील वाढलेली झाडेही तोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांकडून अशा झाडांची माहिती मिळाल्यानंतर त्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र नागरिकांच्या तक्रारीवर अवलंबून असलेली ही व्यवस्था पुरेशी नसल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील
राज्यातील अनेक महापालिकांनी धोकादायक झाडांचे जीआयएस आधारित मॅपिंग, क्रमांक देऊन नोंदणी आणि नियमित आरोग्य तपासणीची प्रणाली विकसित केली. मात्र चंद्रपूरमध्ये अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा अद्याप अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करणेही प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते. नागरिकांनीही धोकादायक झाडे, तुटलेल्या फांद्या किंवा झुकलेल्या वृक्षांची माहिती तातडीने महापालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर महापालिकेने शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करावी, जोखीम पातळीनुसार वर्गीकरण करावे आणि पावसाळा जोर धरण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात व्याहाडी पेट्रोल पंप परिसर, ताडोबा रोड, तुकूम तसेच शहरातील इतर काही भागात मोठी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एका घटनेत उभी असलेल्या कारचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा घटना भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये, उद्याने आणि निवासी वस्त्यांमध्ये अनेक दशकांपूर्वीची मोठी झाडे आहेत. त्यापैकी काही झाडे वयोमानामुळे कमकुवत झाली असून, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ती कोसळण्याचा धोका वाढतो.






