नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी सायंकाळी थांबला आहे. उद्या (दि.20) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान होत असून, उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली, लखनौसह 13 जागांवर फक्त पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल आणि स्मृती इराणी, भारती पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून, स्मृती इराणी अमेठीतून, पीयूष गोयल मुंबई उत्तरमधून आणि ओमर अब्दुल्ला बारामुल्लामधून निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक प्रचाराच्या पाचव्या टप्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी विविध राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला आहे.
रायबरेली, अमेठी व वायनाडकडे सर्वाधिक लक्ष
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभेच्या जागा आघाडीवर आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघाव्यतिरिक्त राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या जागेवर राहुल गांधी भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात लढत आहेत.






