कणकवली/ भगवान लोके: विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेत जनेतेचे आभार मानले आहेत. जठार म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीला अभुतपुर्व असे यश मिळाले आहे. “एक है तो सेफ है..” पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या संदेशाला राज्यासह कोकणातील जनतेने पुर्णतः सेफ कौल दिला आहे. आता केंद्रापासुन राज्यापर्यंत सर्वच सत्ता महायुतीची आहे. तसंच खासदार आणि आमदार देखील महायुतीचेच निवडुन आल्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल. पुढील पाच वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्गात २ लाख रोजगार निर्माण होईल. असा विश्वास कोकणाती जनतेला जठार यांनी दिला आहे.
प्रमोद जठार पुढे असंही म्हणाले की, कोकणातील जनता ठाकरे गटाच्या नादी न लागता महायुतीच्या पाठीशी राहीली आहे. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद मिळवुन देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीत ठाकरेसेना विलीन करावी, असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला आहे.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जठार यांच्यासोबत शिडवणे सरपंच रवींद्र शेटये, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलु सावंत, नरेंद्र भाबल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग –रत्नागिरी या विधानसभेतील ६ आमदार महायुतीचे निवडुन आले आहेत. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी कोकणातील जनतेने आमदार निवडुन दिले आहेत. जसं महायुतीला यश मिळालं तसं महाविकास आघाडी का अपयश मिळाले? ही बाब लक्षात घेतली पाहीजे.
उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावताना प्रमोद जठार म्हणाले की, ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी निकालानंतर ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री असे वक्तव्य केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी, उबाठाच्या लोकांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले, असा आरोप जठारांनी केला.
हेही वाचा- सावंतवाडीत दीपक केसरकरांचा विजयी चौकार ; ठाकरे गटाच्या राजन तेलींवर केली मात
प्रमोद जठार यांनी यावेळी ठाकरे गटातील अंतर्गत वादाचा देखील मुद्दा उपस्थित केला आहे. जठार म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार या दोघांचा निषेध केला.चेहरा जाहीर केला नाही,म्हणुन पराभव झाल्याचे मत अंधारे यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी त्यांच्यातच बंडखोरी झाली त्याचे पडसाद उमटले आहेत. राजापुरमध्ये अविनाश लाड यांनी बंडखोरी केली, त्यामुळे साळवी पराभूत झाले, असा टोला देखील प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
महायुतीच्या कामाबद्दल बोलताना जठार म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात गेल्या सहा महिन्यात फक्त घोषणा केली नाही तर काम ही करुन दाखववलं . शेतकऱ्यांचे वीज बिल माफी ,लाडकी बहिण योजनेचे थेट पैसे जमा केले. त्यामुळे लोकांना हे अंमलबजावणी करणारे सरकार दिसून आले. महायुतीतील नेते मुख्यमंत्री पदासाठी भांडत राहीले नाहीत. त्यामुळेच महायुतीला राज्यात अनपेक्षीत बहुमत मिळाले. दरम्यान कोकणात खासदार नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे वादळ निर्माण करणार आहोत.महायुती आजपासून कामाला लागली आहे. नाणार प्रकल्प लोकांना नको असेल तर ज्याठिकाणी आवश्यक असेल तिथे होईल. शेतकरी तयार असल्यास खासदार राणेंच्या नेतृत्वासाठी नाणारसाठी प्रयत्न केला जाईल. बाळासाहेबांचा शब्द काँग्रेसकडे हिंदुत्व गहाण ठेवत खरा केला आहे. त्यामुळे खरी बाळासाहेबांची विचारांची शिवसेना एकनाथ शिंदेसोबत आहे, असेही जठार म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अपक्ष विशाल परब यांनी घेतलेली मतं ही दीपक केसरकर यांना चांगले मताधिक्य देणारी ठरली. जे माझ्या विरोधी पक्षात असलेले मित्र पराभुत झाले आहेत. त्यांनी आहात तिथे सुखी रहा,लोकांच्या कल्याणासाठी काम करा. राजकरणात वेगळ्या पक्षात असलो तरी त्यांनी काम करावे .या सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करावे.कोकणात कात टाकली जात आहे,नकारात्मक विचार चालणार नाही.जगातील चांगल्या गोष्टी आहेत,त्या कोकणी जनतेला हव्या आहेत. त्याचे आड येवू नये. संदेश पारकर उमेदवार असल्यामुळे किमान डिपॉझिट वाचले जर सतीश सावंत किंवा रावराणे असते तर डिपॉझिट जप्त झाले असते, असा टोला प्रमोद जठार यांनी कडव्या शब्दात ठाकरे गटाला लगावला आहे.