रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे या छोट्याशा गावातील ३१ वर्षीय मिथिलेश देसाई यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देत फणस शेतीत एक वेगळीच क्रांती घडवून आणली आहे. वडील हरिश्चंद्र देसाई यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या प्रवासाने आज जागतिक पातळीवर झेप घेतली आहे.
1972 आणि त्यानंतर मिथिलेशचे वडील रस्त्यावर फणस विकायचे, त्यावेळेला 25 पैसे ते 50 पैसे ला एक फणस इतका भाव होता. त्यानंतर 2013 ला त्यांनी स्वतःची जागा घेऊन फणस लागवडीला सुरुवात केली, तेव्हा एक फणस 5 रुपयांना मिळायचा. त्यानंतर 2016 मध्ये मिथिलेश यांनी वडिलांच्या व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली, त्यावेळेला एका फणसाचा भाव 10 रुपये होता. आणि आज किमान 10 ते 20 रुपये किलो म्हणजेच 100 ते 200 रुपये एका फळाची किंमत झाली आहे. फणस किती फायदेशीर आहे ह्याची ओळख दिवसेंदिवस जगाला होत आहे.
मिथिलेश यांनी आपल्या २८ एकर क्षेत्रात ७० हून अधिक जातींच्या फणसांची लागवड केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ‘जॅकफ्रूट किंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी’चा वार्षिक टर्नओव्हर आता ₹१ कोटींवर पोहोचला आहे. या उपक्रमातून कर्करोग संशोधनासाठी जर्मनीला फणसाची पाने निर्यात केली जात आहेत, ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
त्यांनी नोकरी न करता शेती करायचा विचार केला आणि दुर्लक्षित फळाला म्हणजेच फणसाला कोकणात आणि महाराष्ट्रात कशी उत्तम व्हॅल्यू मिळेल हा निस्वार्थी प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांना भारतातील प्रत्येक राज्यात काम करायच आहे आणि त्याची सुरवात लवकरच नॉर्थ ईस्ट भागापासून करण्याचा त्यांचा मानस आहे. फणस हे केवळ अख्ख फळ म्हणून न जाता बाय प्रोडक्ट म्हणुन मार्केट मध्ये जाईल ह्याचा ते निरंतर प्रयत्न करत आहेत.
मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी २००० साली केरळला जाऊन फणसाच्या ३६ जातींची माहिती घेतली आणि ती रोपटी झापडे गावात लावली. मिथिलेश यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर फणसावर आधारित पोषण, प्रक्रिया आणि उत्पादन या विषयांवर संशोधन सुरू केले.
२०१८ साली त्यांनी ‘हरीशचंद्र’ ही फणसाची नवीन जात विकसित केली. प्रारंभी वर्षाला १,००० रोपटी विकली जात होती, ती संख्या आता दरवर्षी २५,००० पर्यंत पोहोचली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ९०० शेतकऱ्यांना एकत्र करून ‘फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ (FPC) स्थापन केली. आज अनेक लघु व मध्यम शेतकऱ्यांना फणस शेतीतून स्थिर उत्पन्न मिळत आहे.
ते फणसावर आधारित शाकाहारी मांसाचे पर्याय तयार करत आहेत. फणसाचे चिप्स, पीठ, पल्प आणि पौष्टिक पावडर यांना देशात आणि परदेशातही चांगली मागणी आहे. ११,००० चौ.फुट क्षेत्रफळावर आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या केंद्रातून दरवर्षी ५ टन उत्पादनाची क्षमता असणार आहे आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहे.
फणसाच्या ८६ हून अधिक जातींच्या संगोपनातून १,५०० झाडांचा बाग प्रकल्प, सेंद्रिय पद्धतीने शेती, शासनमान्य नर्सरी, कर्करोगावर उपचारासाठी उपयोगी पानांची निर्यात, आणि देशविदेशातून आलेली मान्यताप्राप्ती, हे सर्व मिळवून देसाई पितापुत्रांनी कोकणात एक आदर्श निर्माण केला आहे.
भविष्यात जेव्हा केव्हा आपण हॉटेल मध्ये जाऊ तेव्हा मेनू कार्ड बघितल्यावर नाश्त्यामध्ये फणस असेल, स्टार्टर मध्ये फणस असेल, मेन कोर्स मध्ये फणस भाजी – फणस टिक्का असेल, राइस मध्ये फणस बिर्यानी असेल, ज्यूस मध्ये फणसाचा जूस असेल, फणसाचा Ice-cream असेल हे व्हिजन डोळ्यापुढे ठेवून हे पितापुत्र काम करत आहेत. जेणेकरून शेतकरी उत्पादक कंपनी किंवा फक्त कोकण नाहीतर फणस ह्या Ecosystem मध्ये काम करणार्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम प्रकारचा आर्थिक मोबदला मिळेल.
मिथिलेश देसाई यांचा फणसकेंद्रित शेती-उद्योग हा प्रयोग महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. पारंपरिक पिकाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिल्यास त्यातून केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक बदलही घडू शकतो — हे त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध केले आहे.