मलेरियाबाबतचे गैरसमज दूर करा: जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
मलेरिया हा एक परजीवीमुळे होणारा आजार आहे, जो संक्रमित मादी Anopheles डासांच्या चाव्यामुळे माणसांमध्ये पसरतो. हा आजार सर्वपरिचित असला तरीही सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज अजूनही अस्तित्वात आहेत. काही लोकांचा असा समज आहे की मलेरिया थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो, तर काहींना वाटते की मलेरिया पसरवणारे डास फक्त रात्रीच चावतात. याशिवाय, मलेरियामध्ये नेहमीच जास्त ताप येतो आणि एकदा मलेरिया झाला की पुन्हा होत नाही, असेही मानले जाते. हे गैरसमज धोकादायक ठरू शकतात, कारण त्यामुळे लोक आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि तपासणी व उपचारात उशीर होतो, ज्यामुळे काही वेळा जीवितहानीही होऊ शकते.याबद्दल सविस्तर माहिती डॉ. शालिनी सुरळकर, Director – Internal Medicine and Rheumatology, Dr L H Hiranandani Hospital Powai, यांनी दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्यक्षात, मलेरिया व्यक्तीकडून व्यक्तीकडे पसरत नाही. तो संक्रमित मादी Anopheles डासाच्या चाव्यामुळे होतो. असा डास माणसाला चावल्यानंतर परजीवी रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि यकृतात (लिव्हरमध्ये) जाऊन विकसित होतो. त्यानंतर तो लाल रक्तपेशींना संक्रमित करतो. संक्रमित पेशी फुटल्यावर रुग्णाला तीव्र थंडी वाजणे, अंग कापणे आणि जास्त ताप येणे अशी लक्षणे दिसतात, आणि ताप उतरल्यावर घाम येतो. हा पॅटर्न दररोज किंवा एकाआड दिवशी दिसू शकतो, हे परजीवीच्या प्रकारावर अवलंबून असते. काही प्रकारांमध्ये, जसे की Plasmodium vivax मलेरिया, परजीवी यकृतात सुप्त अवस्थेत राहू शकतो आणि काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी पुन्हा लक्षणे निर्माण करून आजार परत होऊ शकतो.
मलेरिया सहसा पावसाळ्याशी जोडला जातो, कारण या काळात साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होते. मात्र, याचा अर्थ मलेरिया फक्त पावसाळ्यातच होतो असा नाही. बांधकामे, पाण्याची गळती किंवा खराब ड्रेनेज यांसारख्या कारणांमुळे वर्षभर साचलेले पाणी आढळू शकते. त्यामुळे मलेरियाचे रुग्ण वर्षभर दिसू शकतात, जरी पावसाळ्यात त्यांची संख्या जास्त असते.
आणखी एक चिंतेची बाब म्हणजे अनेक लोक मलेरियाला सौम्य आजार समजतात आणि घरगुती उपायांवर अवलंबून राहतात किंवा डॉक्टरांकडे जाणे टाळतात. ही पद्धत धोकादायक ठरू शकते, कारण मलेरिया गंभीर स्वरूप धारण करून मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकतो. विशेषतः falciparum मलेरियामध्ये, वेळेवर उपचार न झाल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. योग्य उपाय म्हणजे लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे, आवश्यक तपासण्या करून घेणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण उपचार करणे.
वैद्यकीय विज्ञानात प्रगती होत असली आणि जागरूकता वाढत असली तरी मलेरियासाठी लसी अजून व्यापक आणि पूर्णपणे विश्वासार्ह उपाय ठरलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या प्रतिबंधासाठी जनजागृती, स्वच्छता आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून डास नियंत्रण उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी
डासांची पैदास रोखल्यास मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. साचलेले पाणी काढून टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना सहकार्य करणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. भविष्यात लसींची भूमिका वाढू शकते, मात्र सध्या सातत्यपूर्ण प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार हेच मलेरियावर मात करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत.






