संग्रहित फोटो
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गांधीनगर (ता. करवीर) येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण खून केला आहे. सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी हे येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचे समजते. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल हा आपल्या आई, वडिल, बहिण आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होता. रात्री साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या पान शॉपपासून मारेकऱ्यांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचे वार करत बाजूच्या जीपी ग्रुपपर्यंत आणले त्याठिकाणी त्याला मारुन टाकून मारेकरी पळून गेले. मारेकऱ्यांनी विठ्ठलच्या हातावर तसेच चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले होते.
विठ्ठल आणि मारेकरी हे गांजेकस, व्यसनी असल्याचे समजते. विठ्ठल हा येथील एका दुकानात नोकरी करत होता. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ करत आहेत.
हे सुद्धा वाचा : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.