Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २९ मार्चपर्यंत तब्बल ५५ हजार ७३१ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अवघ्या २९ दिवसांत १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली झाली असून, महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडली आहे.
थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १ मार्च २०२६ पासून अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत देण्यात आल्याने नागरिकांनी पुढाकार घेत थकबाकी भरल्याचे दिसून आले. यामुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २९ दिवसांत एकूण ६८ हजार ४८८ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ५५ हजार ७३१ जणांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांना एकूण ३८ कोटी ८१ लाख रुपयांची दंडावरील सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाल्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत मर्यादित असल्याने उर्वरित थकबाकीदारांसाठी ही अंतिम संधी ठरणार आहे. अद्याप थकबाकी असलेल्या नागरिकांनी तातडीने कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. समक्ष भेटींद्वारे जनजागृती केली जात असून, ऑनलाइन, धनादेश आणि कॅश काउंटरद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत कॅश काउंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी अभय योजना ही नागरिकांना दिलासा देणारी आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीस बळकटी देणारी ठरल्याचे सांगितले. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या योजनेमुळे कर वसुलीत वाढ झाल्याचे नमूद करत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरण्याचे आवाहन केले.
पुणे महापालिकेतही योजनेला चांगला प्रतिसाद
महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या चार महिन्यात राबविण्यात आलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या चार महिन्यात १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेतुन ९५४ कोटी ७८ लाख ६४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.






