मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.
[read_also content=”शरद पवार व राज ठाकरे यांची मी ऋणी राहिन – ऋतुजा लटके https://www.navarashtra.com/maharashtra/thanks-to-sharad-pawar-and-raj-thackeray-for-andheri-election-candidate-application-337048.html”]
दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. अर्ज मागे घेतल्यास रमेश लटके यांनी खरी श्रद्धांजली असेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपाने अर्ज मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना आज दुसरं पत्र लिहलं असून, त्यांनी भाजपाचे आभार मानले आहेत. प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र ! काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार… असं पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.