उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या
अहिल्यानगर शहरातील महापालिका प्रशासनातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे यांनी सोमवारी सकाळी मनपा प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. या तपासणीत सुमारे १५० कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचारी नियोजित वेळेनंतर कार्यालयात पोहोचल्याचे आढळून आले. यापुढे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापौरपदाची सूत्रे ६ फेब्रुवारी रोजी स्वीकारल्यानंतर ज्योतीताई गाडे यांनी तातडीने प्रशासनाची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे आणि नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पाडावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक कर्मचारी या सूचनांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वतः खातरजमा करण्यासाठी तपासणी मोहीम राबवली. सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता त्या स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यासह महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्या. उन्हात उभे राहून त्यांनी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. या तपासणीत ४१ कर्मचारी उशिरा आल्याचे स्पष्ट झाले.
महापौर गाडे म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या उशिरामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात आणि त्यांचा रोष पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होतो. त्यामुळे यापुढे कामचुकारपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू; मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गई केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Latur Municipal Corporation: लातूर मनपात स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला; अधिकृत निवड आज होणार
कामावर येण्याची वेळ न पाळणे ही मनपा कर्मचाऱ्यांची जुनी समस्या असल्याचे बोलले जाते. महापौर काही वेळ गेटवर उभ्या राहिल्या असत्या तर उशिरा येणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असती, अशीही चर्चा आहे.
मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली असतानाही तिचा प्रभावी वापर होतो का? प्रत्येक कर्मचाऱ्याची वेळ नोंदली जात असताना उशिरा येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? तसेच विभागप्रमुख आणि आस्थापना विभाग नेमके काय करत आहेत? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. महापौर ज्योतीताई गाडे यांनी याबाबत विभागप्रमुख आणि आस्थापना विभागाला जाब विचारल्यास प्रशासनातील शिस्त सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






