या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटनेते युवराज गायकवाड यांनी शनिवारी मनपा शाळा क्रमांक ३, ७, १७ व २९ ला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान शाळांच्या इमारतींची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आल्याचे दिसून आले. महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. परिणामी काही शाळांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांमागे केवळ ४ ते ७ शिक्षक कार्यरत असल्याचे वास्तव समोर आले. शाळा क्रमांक ७ मध्ये ४३० विद्यार्थ्यांसाठी अवघे ७ शिक्षक आहेत, तर खणभाग येथील उर्दू शाळेत २५० विद्यार्थ्यांसाठी फक्त ४ शिक्षकांवर शिक्षणाची जबाबदारी आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मद्यपी आणि नशेखोरांचा वावर वाढत असल्याचे स्पष्ट
सुरक्षेच्या दृष्टीनेही परिस्थिती चिंताजनक आहे. मनपाच्या ४० शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी महापी आणि नशेखोरांचा वावर होत असल्याची माहितीही समोर आली. तसेच अनेक शाळांची स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसून काही ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने इमारती असुरक्षित झाल्या आहेत. खणभागातील उर्दू शाळेवर गेल्या सात-आठ वर्षात प्रशासनाने कोणताही निधी खर्च केला नसल्याचेही निदर्शनास आले.
6 सत्ताधारी आणि प्रशासनाने केवळ गुणवतेच्या गप्पा न मारता विद्यार्थ्यांना किमान भौतिक सुविधा द्याव्यात. गोरगरीबांच्या मुलाना अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. या प्रश्नावर आम्ही तीव्र आवाज उठवणार आहोत, असं विरोधीपक्ष नेते, मंगेश चव्हाण यांनी सांगितलं आहे.






