Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांच्या अडचणी संपेनात...; ईडी प्रकरणात क्लिनचीटनंतर अंजली दमानिया पु्न्हा कोर्टात
न्यायालयाच्या या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “छगन भुजबळ यांना ज्या प्रकारे दोषमुक्त करण्यात आले आहे, त्याविरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे,” असे दमानिया यांनी स्पष्ट केले. यामुळे कायदेशीर प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन भुजबळांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, “2014 मध्ये मी छगन भुजबळांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापसून मी लढत आहे. भुजबळयांच्या ११ गैरव्यवहारांसंदर्भात माझी याचिका होती. त्या ११ पैकी २ गुन्ह्यांमध्ये भुजबळांना दिलासा मिळाला आहे पण कनिला सेंट्रल लायब्ररीचे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे भुजबळ पूर्णपणे दोषमुक्त झाल्याचा दावा खरा नाही.”
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांच्या दोषमुक्तीविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मुख्य तक्रारदार होता, तर सक्तवसुली संचालनालय (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या कोनातून तपास करत होते, त्यामुळे या यंत्रणांनी दोषमुक्तीला विरोध करणे आवश्यक होते, असे मत दमानिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवर कडाडून टीका करताना म्हटले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना संरक्षण दिले आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तेच करत आहेत.
विरोधी नेत्यांवर आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा आणि नंतर त्यांना स्वतःच्या पक्षात किंवा युतीत सामील करून घ्यायचे, हे भाजपचे जुने तंत्र असल्याची टीकाही त्यांनी केली. फडणवीस सध्या भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचा गंभीर आरोप करत, दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी त्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, यासंदर्भात देशाचे सरन्यायाधीश, न्यायवृंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिणार आहेत. एसीबीने याप्रकरणी अपील करणे अपेक्षित होते, मात्र सर्वच राजकीय पक्ष आणि यंत्रणांचे साटेलोटे असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.






