सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
प्रवीण दरंदले पाटील, चितळी : हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही भारताची संस्कृती, संस्कार आणि सनातन विचार अबाधित राहण्यामागे वारकरी परंपरा, हरिनामाची परंपरा आणि संतांची गुरुपरंपरा हेच प्रमुख कारण आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेली १७९ वर्षांची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील अध्यात्म, संस्कार आणि सज्जनशक्ती जिवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. तसेच सद्गुरूंच्या आशीर्वादाने सरला बेटाचा महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सर्वांगीण विकास केल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या प्राचीन संस्कृतीपासून वारकरी संप्रदाय, हरिनामाचे महत्त्व, सरला बेटाचा विकास आणि शेतकरी हिताच्या निर्णयांपर्यंत विविध विषयांवर भाष्य केले.
Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
फडणवीस म्हणाले, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज तसेच महंत रामगिरीजी महाराज यांची ही किमया आहे की, अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आणि सभ्यता आहे. जगाच्या इतिहासात अनेक देशांवर आक्रमणे झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला. विचार, धर्म आणि संस्कृती बदलली; मात्र भारतामध्ये तसे परिवर्तन होऊ शकले नाही.
हजारो वर्षे आक्रमकांनी आक्रमणे केली, किल्ले जिंकले आणि मंदिरे पाडली; मात्र भारतीयांच्या मनातील ईश्वराचे स्थान ते बदलू शकले नाहीत. भारतातील वारकरी परंपरा, हरिनामाची परंपरा, सनातन परंपरा आणि हिंदू धर्माच्या परंपरेमुळे कितीही आघात झाले तरी भारतीयांनी आपला विचार, संस्कार आणि मार्ग बदलला नाही. संतांनी दिलेल्या गुरुपरंपरेमुळे आम्हाला मानसिकरित्या कोणीही गुलाम करू शकले नाही, असे ते म्हणाले.
आषाढीच्या निमित्ताने कोणालाही निमंत्रण न देता वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने जातात. आक्रमणे अनेक झाली, तरी ही पावले कोणीही थांबवू शकले नाही. हरिनामाचा आणि पांडुरंगाचा गजर कधीही थांबला नाही. ही खऱ्या अर्थाने संतांनी आपल्याला दिलेली परंपरा आहे. १७९ वर्षे सातत्याने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा कित्येक पिढ्यांनंतरही आज महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत संतांनी हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. हरिनाम हे असे नाव आहे की, जे दुःखाचे हरण करू शकते. हरिनामाच्या संकीर्तनामुळे माणसामधील ‘मी’पणा नष्ट होतो आणि सर्वजण एक होतात. तेथे स्वार्थ आणि जातीपातीचा विचार राहत नाही, तर प्रत्येकजण एकमेकांमध्ये विठ्ठल आणि हरीचा वास पाहतो. आजच्या जगामध्ये हरिकीर्तन आणि संकीर्तनापेक्षा जीवन यशस्वी करण्यासाठी दुसरा मोठा उपाय नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.महंत रामगिरीजी महाराज यांनी उभा केलेला मोठा संप्रदाय महाराष्ट्राची आणि भारताची सज्जनशक्ती म्हणून काम करीत आहे. हा संप्रदाय हरिभक्तीचे काम करीत असतानाच समाजातील अध्यात्म, संस्कृती आणि संस्कार जिवंत ठेवण्याचे तसेच पुढील पिढीमध्ये त्या संस्कारांचे रोपण करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
मागील काळात सरकारने सरला बेटाच्या विकासाचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्माचा वास आहे आणि ज्या ठिकाणाहून समाजाला विचारांची प्रेरणा मिळते, त्या सरला बेटाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे हॉल, रस्ते तसेच पूरसंरक्षणाची कामे सुरू असून, पुढील काळात हा विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर सरला बेट संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी एक ऊर्जेचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरला बेटावर सौरऊर्जेचे कामही हाती घेण्यात येणार असून, संपूर्ण सौरऊर्जेच्या माध्यमातून तेथील व्यवस्था उभी करण्यात येईल. सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास केल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
आमच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती आणि सज्जनशक्ती उभी असल्यामुळे महाराष्ट्रात विजय मिळाला. त्यामुळे शेतकरी, वारकरी, शेतमजूर, गरीब, दलित आणि आदिवासी अशा सर्व घटकांना सोबत घेऊन राज्याचा कारभार करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करीत कर्जमाफीची केवळ घोषणा न करता कालपर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवण्यात आले आहेत. दर पंधरा दिवसांनी नवीन यादी करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असून, ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून, वर्षातील ३६५ दिवस दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांपर्यंत दिवसा वीज पोहोचविण्यात यश आले असून, हळूहळू शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यात येईल. त्यानंतर ३६५ दिवस आणि दिवसाचे १२ तास शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांवरील ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करून त्याची कोणतीही वसुली केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.बळीराजा हा केवळ ग्रामीण भागाचा नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हाच शेतकरी हरिनाम आणि सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील आध्यात्मिक शक्ती जागृत ठेवतो आणि संस्कार व परंपरा टिकवून ठेवतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महंत रामगिरीजी महाराजांना धमक्या देणाऱ्यांनाही कठोर शब्दांत इशारा दिला. काही जण महंत रामगिरीजी महाराजांनाही धमक्या पाठवतात. संतांना अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे काम जर कोणी केले, तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही संतांच्या केसालासुद्धा धक्का लागू देणार नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.आपल्या सर्वांचे पाठबळ आणि आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहेत. आपण सर्वांनी स्वीकारलेल्या सन्मार्गावर चालण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गोदाधाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होतं असल्याचेही त्यांनी सांगितले.






