जिप अध्यक्षपदासाठी पाटील-सावंत यांची प्रतिष्ठेची लढत, अर्चना पाटील की सावंत गटाचा उमेदवार? (फोटो सौजन्य-Gemini)
शीतलकुमार शिंदे । धाराशिव : धाराशिवच्या मिनी मंत्रालयाचा कारभारी अर्थात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शुक्रवारी १३ मार्चला ठरणार असून जिल्ह्यातील महायुतीचे दोन मातब्बर नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करत आपलाच अध्यक्ष व्हावा या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी आमदार पाटलांच्या अर्धांगिनी जिपच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील की, आमदार सावंतांच्या मर्जीतील अन्य कुणी अध्यक्ष होणार यावर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा परिषदेत भाजपाकडे १९ इतके संख्याबळ असून महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीचे ६ आणि ४ अपक्ष मिळून २९ इतके संख्याबळ आहे. शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपाच्या बाजूने असल्याचा भाजपाचा प्रबळ दावा असून या ३१ सदस्यांच्या बळावर आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचा भाजपाचा दावा आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे (शिंदे) १५ सदस्य असून शिवसेना अभेद्य असल्याचा दावा करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे) चक्क उबाठा आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापनेसाठी मजबूत मोर्चे बांधणी केली असल्याचा दावा केला आहे. उबाठाचे ७, काँग्रेसचे ३ आणि समाजवादी पार्टीच्या एकमेव सदस्यासह ४ अपक्षही आपल्या सोबत असून, अशा प्रकारे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर आपल्याकडेच असल्याचा दावा सेनेकडून सातत्याने केला जात आहे.
दरम्यान, भाजपाच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चना पाटील, उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे) तर बांधकाम सभापतिपदी राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांना विराजमान करण्यात येणार असून चार अपक्ष सध्या भाजपासोबत आहेत. शिवसेनेचे आमदार सावंत यांच्यासोबत ते चार अपक्ष सल्याचा दावा फोल असल्याचा दावा करण्यात या भाजपाच्या स्थानिक सूत्रांनी केला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक पातळीवरही उबाठा आणि काँग्रेससोबत शिवसेनेची युती कदापी मान्य होणारी नसून आमदार सावंतांचे आडाखे फोल ठरणारे असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या बाबत उबाठा आणि काँग्रेसकडून कसल्याही प्रकारच्या स्पष्ट किंवा धूसर आशा हालचाली दिसत नसून उबाठाचे आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही या बाबत गप्प असल्याचे चित्र आहे. एकंदरीत भाजपाकडे मॅजिक फिगरच्या संख्याबळासह यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत असून निवडून आलेल्या क्षणापासून भाजपाने प्रायोजित केलेल्या सहलीवर हे सर्व ३१ सदस्य गेलेले आहेत.
याबाबत शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना या घडामोडी विषयी विचारणा केली असता, त्यांनी गुरुवारी रात्री शिवसेनाप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला निर्णय सांगतील, त्याप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करू. असे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख शिंदे हे उबाठा किंवा काँग्रेस सोबत जाण्यास तयार होतील का या प्रश्नावर, त्यांनी अनधिकृतपणे सांगायचे झाले तर, साहेब असे कांही सांगणार नाहीत. मात्र साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हला मान्य असेल. आम्ही त्याची अंमलबजावणी करू. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाची सगळी तयारी झालेली असून उद्या भाजपाचा सदस्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होईल. सोबत असलेल्या राष्ट्रवादीसह (अजित पवार) सर्वांशी सगळी बोलणी झालेली आहेत. उपाध्यक्ष आणि अन्य विषय समित्याही कोणाकडे असतील याचे चित्रही उद्याच स्पष्ट होईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली.






