दहावीच्या परीक्षेसाठी मावळमधील २३६९ विद्यार्थ्यांना 'घर ते परीक्षा केंद्र' मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा
‘घर ते परीक्षा केंद्र’ सुविधा
इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला, अजिवली, वराळे, साई, नवीन उकसान, नाणे, सोमाटणे, बेबेडओहोळ, परंदवडी, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, सुदुंब्रे, आढले बुद्रुक, करुंज, देवघर, उकसान आदी गावांतील विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ आणि परीक्षा संपल्यानंतर परतीचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील १७ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,६४९ विद्यार्थी बसणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे.
मावळ तालुक्यातील अनेक गावे डोंगराळ व दुर्गम भागात आहेत. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बससेवा मर्यादित असते. तसेच खासगी वाहतुकीच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोफत वाहतूक सेवेने विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण कमी होत असून, वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. गेल्या नऊ वर्षांप्रमाणे यंदाही पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
“विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबत त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील.”
— आमदार सुनील शेळके
मावळ तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आश्वासक ठरत असून, दहाव्या वर्षात पदार्पण करताना या सेवेला अधिक व्यापक प्रतिसाद मिळत आहे.






