धक्कादायक ! वैद्यकीय उपचारासाठी करावी लागली तब्बल 18 किलोमीटर पायपीट; ग्रामस्थांच्या धाडसाने वाचले प्राण (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
गडचिरोली : दुर्गम भागातील प्रेरणादायी उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे पाहायला मिळाले. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा नसताना तब्बल 18 किलोमीटर स्टेचरवरून पायी नेत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी, आशासेविका आणि ग्रामस्थांच्या धाडस व सेवाभावामुळे जखमीवर वेळेत उपचार होऊन त्याचे प्राण वाचले.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगतच्या डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या बिनागुंडा गावातील पोरीया गोगा तिम्मा (वय ३५) हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दामणमर्का गावाकडे जात असताना रस्त्यालगतच्या जंगलातून आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. बुधवारी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी असतानाही ग्रामस्थांनी जखमीला स्टेचरवर झोपवून प्लास्टिकने झाकले आणि लाहेरीकडे पायी प्रवास सुरू केला. मार्गातील नाले कंबरभर पाण्याने भरून वाहत असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी ते पार केले.
सततच्या पावसामुळे चिखलातून वाट काढत गुंडेनूर नदीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे पाच तास लागले. घटनेची माहिती मिळताच लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गुंडेनूर नदीपर्यंत पोहोचली. तेथून जखमीला लाहेरी येथे आणून तातडीने उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
जीव मुठीत घेऊन प्रवास
या संपूर्ण बचाव मोहिमेत आरोग्यसेविका अश्विनी सहारे यांनी जखमीसोबत तब्बल 18 किलोमीटर पायी प्रवास केला. त्यांच्यासोबत आरोग्यसेवक सुधाकर रामटेके, आशासेविका मासे दुर्वा तसेच ग्रामस्थांनीही रात्रभर जखमीची साथ सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेल्या त्यांच्या सेवाभावामुळे जखमीला वेळेत उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकले.
दुर्गम भागातील मुलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही कायम
बिनागुंडा परिसरात आजही नदी-नाल्यांवर पूल नसणे, माती-मुरूमाचे रस्ते आणि अपुरी दळणवळण व्यवस्था यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुर्गम भागातील मुलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे.
जखमीवर रात्रभर बिनागुंडा उपकेंद्रात उपचार
घटनेची माहिती मिळताच बिनागुंडा उपकेंद्रातील आरोग्यसेविका अश्विनी सहारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीवर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी हलविणे शक्य झाले नाही. त्यामुळे जखमीवर रात्रभर बिनागुंडा उपकेंद्रात उपचार करण्यात आले.






