अजिंक्य राहाणे याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर पत्नी राधिकाने एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली, तिने लिहिले की, ‘या आयपीएल हंगामासाठी तू एअरपोर्टकडे निघाला होतास, तेव्हा लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी तू मला म्हणालास, ‘चलो रॅड्स, हा शेवटचा हंगाम आहे. मी हे एकदा शेवटचं करून दाखवणार.’ मला आजही आठवतंय, त्या क्षणी मी तिथेच उभी राहिले होते… काय बोलावं, कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. त्या एका क्षणात असंख्य आठवणींचा पूर आला,तुझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.’
राधिकाने पुढे लिहिले की, ‘पहाटेच्या वेळचे तुझे वर्कआउट्स आणि सराव सत्रं, सामन्यांपूर्वीची चिंता, संघातील निवडीचा ताण, सतत बॅग भरत राहणे आणि पुन्हा रिकामी करणे, तुझी शिस्त, त्याग, समर्पण… क्रिकेटपटू म्हणून तुझ्या आयुष्याची ओळख बनलेल्या या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. हे सगळं आता एका टप्प्यावर येऊन थांबणार आहे, हा विचारच खूप भावूक करणारा होता. आणि आता जेव्हा हा क्षण खरोखर समोर आला आहे, तेव्हा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला तुझा खूप अभिमान आहे. फक्त मैदानावर तू मिळवलेल्या यशासाठी नाही, तर या संपूर्ण प्रवासात तू ज्या प्रकारे एक माणूस म्हणून स्वतःला घडवलंस, त्यासाठीही मला तुझा अभिमान आहे. तुझ्या या प्रवासाचा एक भाग बनण्याची आणि तो इतक्या जवळून अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. तुझा प्रवास केवळ माझ्यासाठी नाही, तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. तू क्रिकेटला तुझं मन आणि आत्मा दिलास, आणि क्रिकेटने तुला आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा अनेक आठवणी दिल्या. यश असो किंवा अपयश, चढ-उतार असोत किंवा कठीण काळ… तू नेहमी तुझ्या नावाप्रमाणेच “अजिंक्य” राहिलास म्हणजेच अजेय.आर्या, राघव आणि मी नेहमीच तुझ्यासाठी चीअर करत राहू. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक भागात आम्ही कायम तुझ्या सोबत आणि तुझा अभिमान बाळगत राहू.’
रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे २०२०-२१ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, त्याने दुखापतींनी ग्रासलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि मेलबर्न कसोटीत शतक झळकावून भारताला विजयाकडे नेले. त्यानंतर भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत करून क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्वाच्या कसोटी मालिकांपैकी एक जिंकली.






