मुंबई लोकलमध्ये 'हेल्पलाईन' ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेली रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन प्रभावी ठरत असून, प्रवाशांसाठी ती विश्वासार्ह सुरक्षा कवच बनली आहे. वाढत्या विश्वासाचे द्योतक म्हणजे गेल्या काही वर्षांत तक्रारींच्या संख्येत तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये दररोज सरासरी १०० तक्रारी येत होत्या. मात्र, २०२५ पर्यंत ही संख्या वाढून दररोज १७०० ते १८०० इतकी झाली आहे. यापैकी सुमारे २५ हजार तक्रारी प्रवासादरम्यान बॅग हरवणे किंवा विसरणे यासंदर्भातील आहेत. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून ऑक्टोबर २०१७ पासून ‘१५१२ हेल्पलाइन उपनगरीय तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर दररोज सरासरी १७०० ते १८०० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल बॅग किंवा इतर वस्तू हरवल्याबाबत असतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवासीही मदतीसाठी या हेल्पलाइनचा वापर करतात.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
दररोज येणाऱ्या कॉलपैकी सुमारे १०० ते १३० प्रकरणांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्पलाइनवर एकूण ३६, १६६ कॉल प्राप्त झाले. यापैकी केवळ ६० प्रकरणे अधिकृत गुन्हे म्हणून नोंदवण्यात आली. तर उर्वरित तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. हेल्पलाइनवर येणाऱ्या सुमारे ९९ टक्के कॉल तक्रारी स्वरूपाच्या असतात, मात्र एक टक्क्यांपेक्षाही कमी प्रकरणे गुन्हे म्हणून नोंदवली जातात.
मोबाइल चोरीपासून ते अनधिकृतपणे ताश खेळण्यापर्यंत विविध प्रकारच्या तक्रारी या हेल्पलाइनद्वारे नोंदवल्या जातात. प्रत्येक तक्रारीची नोंद केली जाते आणि प्रकरणाच्या गांभीर्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. अनेक प्रकरणे प्रथम समुपदेशनाद्वारे सोडवली जातात, तर आवश्यकतेनुसार पोलिसांना घटनास्थळी पाठवले जाते.हेल्पलाइनवर सर्वाधिक तक्रारी गहाळ बैंग, सर्वसामान्य प्रवाशांनी दिव्यांग डब्यात प्रवेश करणे, प्रवाशांमधील वाद, तसेच राखीव डब्यातील अनधिकृत प्रवास यासंदर्भात येतात. याशिवाय महिला छेडछाड, चोरी, भिकारी, फेरीवाले, नशेत प्रवास, संशयास्पद व्यक्तींचे वर्तन, साखळी चोरी, मोबाइल चोरी, भांडणे, बमची धमकी अशा एकूण ३२ प्रकारच्या तक्रारीची नोंद केली जाते.






