शक्तिपीठसाठी जमीन अधिग्रहण लवकरच
वर्धा : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण होत गोवा राज्याशी जोडणारा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा एकूण ८०२ किमीचा राहणार असून, तो वर्धा जिल्ह्यातील २ तालुक्यातून जात आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील २० गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे.
नुकताच जमीन मोजणी होऊन वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल (जेएलएसआर) सादर झाल्याने तातडीने आणि तो एमएसआरडीसीकडे पाठवण्यात आला आहे. आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सुमारे ८ हजार ६१५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग वर्धा तालुक्यातील १० व देवळी तालुक्यातील १० गावातून जाणार आहे. त्यासाठी ४८६.७८९ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी भूमिअभिलेख विभागातर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा तालुक्यातील दिग्रस, पांढरकवडा, झाडगाव, गणेशपूर, तिगाव, रोठा, धोत्रा (रेल्वे), निमगाव, पढेगाव, चिकणी तर देवळी तालुक्यातील देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाभूळगाव (खोसे), सैदापूर, कर्मलापूर, वाबगाव, काशिमपूर, खर्डा या गावातून जाणार आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटींची तरतूद
राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या आणि मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) राज्य शासनाने २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परभणी जिल्ह्यातील (Parbhani News) अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात जाणार असून, कित्येकजण भूमिहीन होणार आहेत. परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे शेताची मोजणी करण्यासाठी गेलेल्या पथकास शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. प्रचंड घोषणाबाजी करत महिला व पुरुष शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला.
हेदेखील वाचा : Shaktipeeth Highway ला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण






