
Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची
सत्ताधारी पक्ष विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहे, तर विरोधक अपूर्ण कामे, रखडलेली आश्वासने आणि जनतेच्या अपेक्षांवर झालेली कुचराई यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘आम्ही काय केले’ आणि ‘त्यांनी काय केले नाही’ या मुक्ष्यांभोवतीच प्रचाराची दिशा फिरताना दिसत आहे. या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे ५३, भाजपाचे ५०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ९, शिंदे गट शिवसेना ३१ तर उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याच पक्षाकडे यावे यासाठी दोन्ही आघाड्यांचे नेते रणनीती आखून कामाला लागले आहेत. कुठे थेट विकासाचा मुद्दा, कुठे भावनिक साद, तर कुठे स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत विकासाचीच आश्वासने दिल्ली जातात, प्रत्यक्षात मात्र त्यांची पूर्तता होताना दिसत नाही, अशी भावना अनेक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या निवडणुकीत मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देणार, महायुती आपली सत्ता कायम राखणार की महाविकास आघाडी नवे समीकरण घडवणार, याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणारा ठरणार असल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी तब्बल २४२ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही अपक्ष उमेदवार प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडत असल्याचे चित्र असून अपक्षांचा कौल निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर
ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असताना काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर भर देत त्यानी जनतेशी थेट संवाद साधला आहे. काँग्रेसने राबवलेल्या विकासकामांची माहिती देत विरोधकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली असून मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. तर, भाजपाचे आ. संभाली पाटील-निलंगेकर यांनीही प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आहे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकहिताच्या योजना, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि विकासकामांचा दाखला देत ‘विकास, स्वैर्य आणि विश्वास’ या मुद्दावर भाजपा ठाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदारानी पुन्हा विकासालाच संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी सभांमधून केले आहे.