Photo Credit- Social Media
कोल्हापूर: भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत. महाडिकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलताना महाडिकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला महाविकास आघाडीच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि त्यांची नावे मला पाठवा आपण त्यांना धडा शिकवू, असे विधान केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महीला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्याच त्याचा फोटो काढून व्हिडीओ बनवा, नंतर त्यांची नावे मला पाठवा, मग मी त्या महिलांना धडा शिकवेन,” असे वादग्रस्त वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले होते.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना धमकी, नंतर घुमजाव; धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
महाडिकांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीनेही त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर टीका केली. खासदार धनंजय महाडिक हे खुल्या व्यासपीठावरून महिलांना गुंडांप्रमाणे धमकावले जात आहे. भाजपची खरी रणनीती, चारित्र्य आणि चेहरा याचाच हा पुरावा आहे. भाजप केवळ महिलांचा सन्मान करण्याचे नाटक करत आहे. महिलांना धडा शिकवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल. अशा शब्दांत काँग्रेसने धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर दिले.
विरोधकांनी घेरल्यानंतर महाडिकांंनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना त्याचा लाभ झाला आहे. माझे म्हणणे असे होते की जर काही महिला काँग्रेससोबत जात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना लाभ मिळावा म्हणून त्यांची नावे आणि छायाचित्रे काढावीत अशी आमची इच्छा आहे. पण काँग्रेसने ते चुकीच्या पद्धतीने घेतले आणि त्याचा अपप्रचार करत आहे.
हेही वाचा : 70 हजार कोटींचे आरोप खरे की खोटे? फडणवीसांनीच उत्तर द्यावं; सुप्रिया सुळेंचा थेट सवाल
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते या योजनांबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. या अफवांना सर्वसामान्य जनता विसरणार नाही.
खासदार महाडिक म्हणाले की, जाणाऱ्या आमदाराने गेल्या पाच वर्षांत कोणतेही ठोस काम केले नाही. काँग्रेस आमदाराने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बदलाची हीच वेळ आहे. त्यामुळे भाजप खासदार अमल महाडिक यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून महायुतीचे सरकार स्थापन करा, असे आवाहनही यावेळी महाडिकांनी केले.