अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना; मुंबईत घडामोडींना वेग
Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मुंबईत मराठा आंदोलकही प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळातही हालचाली वेगाने वाढल्या आहेत. यासगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता मंत्रिंमडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील हे या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पुण्यातील सर्व कार्यक्रम अजित पवार रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर दिसणार नसल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार हे आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आजच आरक्षणाच्या तोडग्याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास येण्याचा कार्यक्रम होता. त्यांनी यासाठी वेळ दिला होता. मात्र, अचानक मुंबईला जावे लागल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार माऊली कटके यांनी दिली.
मराठा आरक्षण प्रश्नावर आज उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार, तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आंदोलकांची मागणी, सरकारची भूमिका आणि पुढील दिशा या बैठकीनंतर निश्चित होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका समोर येते का, याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगे यांनी संयम ठेवावा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सामंत यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी केला जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे की नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Maratha Reservation : “मराठा व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य…; मंत्रिमंडळातील भाजप नेत्याने
महाविकास आघाडीचे नेते या मुद्द्यावर मौन बाळगत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपला मतांचा आकडा ठरवत आहेत, असा आरोपही सामंत यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह बोलावून घेतलेल्या चर्चेचा उल्लेख केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरही त्यांनी भाष्य केले.