संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३५ लाखांच्या घरात आहे. २०५१ मध्ये शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटीच्या घरात राहील. त्यानुसार शहराला किमान ८०० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, पाणी पुरवठा नवीन जलस्त्रोत निर्मिती आणि सुरू असलेल्या योजना सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी आणि ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीला शहरासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध होते. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश उठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. सदरचे काम गतीमान करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता चासकमान, ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आरक्षीत करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे. शहरातील वाढत्या गृहनिर्माण सोसायटींमध्ये पाणी पुरवठा बाबत तक्रारी निर्माण होत आहेत. त्या अनुशंगाने नवीन जलस्त्राेतांबाबत प्रशासनाची तयारी, सुरू असलेले पवना बंद जलवाहिनी आणि आंद्रा-भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देणे आणि शहराचा पाणी पुरवठा सक्षम करणे याबाबत जलसंपदा मंत्री, नगरविकास मंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि उच्चाधिकारी यांची आढावा बैठक आपल्या अध्यक्षतेखाली नियोजित करावी, अशी विनंतीही आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेता, जलस्रोतांची नियोजनबद्ध वाढ आणि सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. शहरासाठी आवश्यक निर्णय वेळीच घेतले जातील, यासाठी मी कटिबद्ध आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.