Nashik Politics: निष्ठावंतांपासून, ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच नाराज; मग भाजपमध्ये आनंदी तरी कोण?
जुन्या, ज्येष्ठ आणि निष्ठावंतांना पक्षाच्या कोणत्याही निर्णयात विचारात घेतले जात नसल्याने वेळोवेळी ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती. आता महानगरअध्यक्ष सुनील केदार यांनी महापौर, उपमहापौर निवडीत आपल्याला विचारात घेतले नाही म्हणून राजीनामा दिला. त्यांनी तो २४ तासाच्या आत मागेही घेतला, हा भाग वेगळा. पण जर पक्षात तिन्ही आमदार, निष्ठावंत कार्यकर्ते, महानगर अध्यक्ष, ज्येष्ठ नेते हे सर्वच नाराज आहेत तर मग पक्षात आनंदी तरी कोण? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिकेत सत्तेच्या सोपानावर विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वच पर्याय वापरले. महापालिकेतील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी ऐनवेळी आयारामांना पक्षात घेतले, मात्र या निर्णयाचा फटका विद्यमान लोकप्रतिनिधींना बसू शकतो. याचा वरिष्ठ पातळीवर विचारच झाला नाही. महाजनांनी नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, नाशिक मध्य या तिन्ही मतदारसंघातून विद्यमान आमदारांच्या विरोधात निवडणूक लढलेले आणि भाजपावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करणाऱ्यांना पक्षात सामावून घेतले. याला तिन्ही आमदारांनी आपापल्या परीने विरोधही केला होता. मात्र तरीही महाजनांनी आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपला अजेंडा राबवला, महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळीसुद्धा महाजनानी जाहीर केलेली उमेदवारी अनेक नगरसेवकांना तसेच आमदारांना धक्का देणारी ठरली. मच्छिंद्र सानप यांच्या निवडीमुळे आमदार राहुल ढिकले यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. आ. फरांदे यांनी सुचविलेल्या नावांकडेसुद्धा महाजनांनी दुर्लक्ष केले.
Maharashtra Politics: शिवसेनेची ताकद वाढणार; माजी आमदारासह आख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार
नाशिकची जबाबदारी घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी एककल्ली कारभार सुरू केल्याचा आरोप त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिका-यांनी वेळोवेळी केला, याप्रश्नी पक्षाचे तिन्ही आमदार मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना देखील भेटले होते. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही, त्यामुळे आता तक्रार तरी करायची कुणाकडे? म्हणून तिन्ही आमदारांनी शांततेचा मार्ग स्वीकारला आणि जे जे होईल, ते ते पहावे या भूमिकेत ते पोहोचले, भाजपासाठी ज्यांनी ३५-४० वर्षे आपले जीवन खर्ची घातले त्यांनादेखील बाजूला सारण्यात आले. त्यामुळे तेही महाजनांवर नाराज आहेत. महानगरप्रमुखही आता विश्वासात घेतले जात नाही, म्हणून नाराज झाले अन् त्यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि सुसंस्कारीत म्हणून ओळख मिरवणा-या पक्षात ज्येष्ठ नेते, निष्ठावंत कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आमदार, महानगरअध्यक्ष है कुणीच महाजनांच्या कामकाजावर खूष नाहीत तर मग शहर भाजपात नक्की खुश तरी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जर कुणीच खूष नाही तर मग राज्य स्तरावरील नेत्यांना याची जाणीच नाही का? की तेथून मिळणाऱ्या पाठबळामुळेच महाजन आपलाच निर्णय या सर्वांवर थोपवत आहेत. या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळाली नाहीत तर महापालिकेत सत्ता एकहाती असली तरी महापौरांना काम करणे कठीण होणार आहे.






